तब्बल 54 शेळ्यांचा इंदापुरात अचानक मृत्यू
इंदापूर : पुढारी वृत्तसेवा
इंदापूरमधील शेळी विक्री व्यवसाय करणार्या नितीन दत्तात्रय पांढरे व अमोल घोडके या दोघा व्यावसायिकांच्या 54 शेळ्या अचानक मरण पावल्याने या व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या शेळ्या नेमक्या कोणत्या कारणाने मरण पावल्या असाव्यात, हे मात्र अद्याप समजलेले नाही.
नितीन दत्तात्रय पांढरे (रा. शिवाजीनगर इंदापूर) व अमोल घोडके (रा. तापी बिल्डिंग इंदापूर) यांचा शेळी विक्रीचा जुना व्यवसाय आहे. शुक्रवारी (दि. 6) यवत बाजारातून 12 ते 13 हजार रुपयाला एक शेळी याप्रमाणे 14 ते 15 शेळ्या त्यांनी विकत आणल्या होत्या. त्या भिगवण येथील मित्राच्या गोठ्यात ठेवल्या. त्यानंतर शनिवारी (दि. 7) काष्टीच्या बाजारातून 23 शेळ्या विकत घेतल्या. भिगवणमध्ये आल्यानंतर मित्राच्या गोठ्यावर ठेवलेल्या शेळ्या आणि काष्टी येथून आणलेल्या शेळ्या अशा 38 शेळ्या इंदापूर येथील मारकड तालिम पाठीमागील असणार्या पत्र्याच्या बंदिस्त शेडमध्ये ठेवल्या. त्यानंतर रविवारी (दि. 8) भिगवण बाजारातून 14 शेळ्या नव्याने खरेदी करून शेडमध्ये इतर शेळ्यांसोबत सोडल्या होत्या.
त्यानंतर सोमवारी या शेळ्या अचनक मरण पावल्या. त्यांच्या मृत्यूचे कारण मात्र लगेच कळू शकले नाही. सर्व शेळ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, पुढील अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
उत्तर प्रदेश सरकारचे मुंबईत कार्यालय, योगी सरकारचा मोठा निर्णय
ही घटना समजताच त्या ठिकाणी भेट दिली असून, मृत शेळ्यांपैकी चार शेळ्यांचे शवविच्छेदनदेखील केले आहे. या शवविच्छेदनात घेतलेले मृत शेळ्यांचे अवशेष सोमवारी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मात्र, शेळ्यांचा मृत्यू हा उष्माघाताने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, प्रयोगशाळेकडून शवविच्छेदनाचा अहवाल दोन दिवसांत प्राप्त झाल्यानंतरच याबाबत नेमका मृत्यू कशाने झाला, हे स्पष्ट होईल.
– डॉ. राम शिंदे, पशुधन विकास अधिकारी, इंदापूर पंचायत समिती