संभाजी भिडे पुन्हा बरळले , “मुस्लीम आणि इस्लाम धर्म हाच खरा देशाचा शत्रू” | पुढारी

संभाजी भिडे पुन्हा बरळले , "मुस्लीम आणि इस्लाम धर्म हाच खरा देशाचा शत्रू"

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध असणारे शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मुस्लिमांबद्दल आणि इस्लाम धर्माबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “ज्या इस्लामच्या पोटतिकडीतून औरंगजेबने संभाजी महाराजांचं बलिदान केलं तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे”, असं वक्तव्य भिडे यांनी केले आहे.

संभाजी महाराज बलिदानासंदर्भात पुण्यात पत्रकारांशी संभाजी भिडे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, “संभाजी महाराजांचा बलिदान मास आपण पाळतोय. त्याच्यात हिंदुस्तानच्या अस्तित्वाला असलेलं आव्हान दडलेलं आहे. औरंगजेब आणि संभाजी ही दोन माणसं होती, त्यांचं वैर होतं म्हणून औरंगजेबने संभाजी महाराजांना तुकडे तुकडे करुन मारलेलं नाहीय. त्याच्या अंतकरणातील इच्छा होती ती वेगळी होती. कन्याकुमारी ते काश्मीर असा उभा देश तुकडे तुकडे करुन हा हिंदू धर्म, हिंदू समाज आणि हिंदुस्तान संपवून टाकावा ही त्याच्या पोटातील आग आणि चीड, दृष्ट भावना त्याने संभाजी महाराजांच्या बलिदानातून पूर्ण करुन घेत अंशत: समाधान मिळवलं”, असं वादग्रस्त स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

“आपण लक्षात घेतलं पाहिजे आज संभाजी महाराज नाहीत, औरंगजेब नाहीय. मेलेली मढी कशाला उकरुन काढायची, आता नवीन युग आहे. नवीन जगासोबत चालुयात, जुनं झालं गेलं विसरुन नव्या जगाबरोबर चालुयात असं म्हणणारी नादान, नालायक, देशघातकी वृत्ती सुशिक्षित लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे”, असे म्हणत संभाजी भिडे यांनी सुशिक्षित लोकांवर टीका केली.

“आज संभाजी महाराज नाहीत, औरंगजेबही नाही. पण औरंगजेब आजही पाकिस्तान, बांगलादेश गाव वस्त्यांमधील मुस्लिमांच्या रुपाने आजही शिल्लक आहे. परंतु संभाजी महाराजांची जी आग होती ज्यात त्यांनी ऐन तारुण्यात आपल्या देशाचा आणि धर्माचा अभिमान न सोडता, न झुकता, न मागे सरकता, न शरण जाता त्यांनी देश देवाचा अभिमान मनात धरुन मरण पत्करलं. परंतु, इस्लाम स्वीकारला नाही. आजही ज्या इस्लामच्या पोटतिकडीतून औरंगजेबने संभाजी महाराजांचं बलिदान केलं. तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे. हा शत्रू अनेक रुपात गावोगावी हिंदुस्तानमध्ये नांदतोय, हिंदुस्तानच्या बाहेरही नांदतोय”, असंही स्फोटक वक्तव्य भिडेंनी केलं आहे.

“इस्लामला त्याच पोटतिकडीने उत्तर देण्याची ताकद हिंदू समाजात संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहून आपण मिळवली पाहिजेत आणि ती मिळते. संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहणं ही स्वातंत्र्याची उपासना आहे, ही धर्माची, मातृभूमिची उपासना आहे. संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहणं ही अत्यंत प्रखर राष्ट्राभिमान उत्पन्न करणारी गोष्ट आहे. ती आपण करुयात आणि एक दिवस असा उजाडावा की, झालेल्या बलिदानाचा सूड घेणारा हिंदुस्तान उभा रहावा ही अंतकरणामध्ये भावना धरुन आपण वाटचाल करत राहूयात”, असे आवाहन संभाजी भिडे यांनी केले आहे.

पहा व्हिडिओ : कॉंग्रेसची वाताहत | Pudhari Podcast

Back to top button