

बारामती: दौंड येथे आर्थिक वादातून घडलेल्या एका खून खटल्यात बारामतीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने बारा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यामध्ये चार सख्ख्या भावांसह तीन महिलांचा समावेश आहे. बारामतीत जिल्हा सत्र न्यायालय स्थापन झाल्यापासून अशा प्रकारे बारा जणांना जन्मठेप सुनावण्याचा हा पहिलाच खटला आहे.
संजित जयप्रकाश टाक, सुजित जयप्रकाश टाक, रवी जयप्रकाश टाक, रणजित जयप्रकाश टाक, आकाश ऊर्फ छोटू दीपक बेहोत, नरेश प्रकाश वाल्मीकी, बबलू हिरामण सरवान, सुरेश हिरालाल सरवान, मयूरी संजित टाक, माधुरी संजित टाक, शोभा किशोर वाल्मीकी व विकी नरेश वाल्मीकी (सर्व रा. दौंड) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.दौंड येथे 3 मे 2018 रोजी ही खुनाची घटना घडली होती. (Latest Pune News)
फिर्यादी मीना नरवाल व त्यांचे पती विनोद नरवाल (रा. दौंड) हे दोघे चतुर्थी असल्याने रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरून गणपतीचे दर्शन घेऊन येत असताना दौंड न्यायालयाजवळ पासलकरवस्ती येथे आरोपींनी त्यांना अडविले.
तलवार, कोयता, लोखंडी पाइप, काठ्या, फरशीचे तुकडे, दगडांनी विनोद यांना बेदम मारहाण केली. मीना नरवाल यांनी पतीला वाचविण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा ऐकून उषा वडमारे तेथे आल्या, त्यांनाही मारहाण झाली. विनोद नरवाल यांना उपचारांसाठी प्रथम दौंड व तेथून पुणे येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता.
मीना नरवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल क?ण्यात आला होता. दौंडचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करीत आरोपींविरुद्ध बारामतीच्या सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. आर्थिक वादातून ही घटना घडल्याचे पोलिस तपासात पुढे आले होते.
न्यायाधीश एस. आर. पाटील यांच्यासमोर हा खटला चालला. त्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी काम पाहिले. त्यांनी दोषसिद्धीसाठी आठ साक्षीदार तपासले, फिर्यादी यांचा पुरावा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचा पुरावा, न्यायवैद्यक पुरावा व जोशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत 12 जणांना खूनप्रकरणी जन्मठेप व प्रत्येकी 25 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 3 महिने कैद, कलम 341 नुसार पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद, कलम 506 नुसार 3 वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, भादंवि 143 नुसार पाच हजार रुपये दंड, कलम 148 नुसार 1 वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली.
सर्व आरोपींनी दंडाची रक्कम 5 लाख 4 हजार रुपये न्यायालयात जमा केल्यास ही रक्कम फिर्यादी मीना नरवाल यांना नुकसानभरपाईपोटी द्यावी, असेही न्यायालयाने निकालपत्रात म्हटले. या खटल्यात अॅड. जोशी यांना सहायक सरकारी वकील डी. एस. शिंगाडे, अॅड. मंगेश देशमुख, कोर्ट पैरवी अधिकारी नामदेव नलवडे, जी. के. कस्पटे, हवालदार मनीषा अहिवळे यांनी सहकार्य केले.