वाडा; पुढारी वृत्तसेवा : वाडा तालुक्यात जल जीवन मिशन या केंद्राच्या योजनेअंतर्गत १३९ योजना राबविल्या जात असून यासाठी भक्कम निधी उपलब्ध असल्याने कंत्राटदारांची चंगळ आहे. नव्याने राबविण्यात येणाऱ्या या योजनांमुळे मात्र अतिशय उत्तम पद्धतीत सुरू असलेल्या जुन्या योजनांना तिलांजली द्यावी लागेल अशी परिस्थिति निर्माण झाली आहे. शिवाय नव्याने येणाऱ्या योजनेसाठी जवळपास दुप्पटीने पाणीपट्टी लोकाना द्यावी लागणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
वाडा तालुक्यातील १३९ गावांमधे जलजीवन मिशन अंतर्गत योजना राबवून प्रत्येक घराला पाणी देण्याचा केंद्राचा मानस आहे. वाडा तालुक्यात मात्र आधीच राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमा अंतर्गत ९८ योजना मंजूर असून त्यापैकी ५९ योजना पूर्ण तर २२ योजना अंतिम टप्प्यात आहेत. जुन्या योजना अजूनही उत्तम सुरू आहेत. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत वर्षाला जवळपास ३६० रूपये पाणीपट्टी लोकाना भरावी लागत असल्याने या योजना लोकाना परवडणाऱ्या आहेत. तालुक्यातील जवळपास ४१ ठिकाणी जुन्या योजना सुस्थितित असताना येथे नविन योजना राबविल्या जात आहेत.