

Virar-Dahanu four-laning project stalled
सफाळे : पुढारी वृत्तसेवा
विरार-डहाणू दरम्यान रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रकल्प अत्यंत संथ गतीने सुरू असून, प्रवाशांना अद्यापही जीवघेणा व त्रासदायक प्रवास करावा लागत आहे. २०१६ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचे वेळापत्रक ठरवण्यात आले नसल्यामुळे आणि विविध परवानग्यांमध्ये झालेल्या विलंबामुळे प्रकल्प रखडला आहे, अशी माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.
या प्रकल्पात सर्वात मोठा अडथळा खारफुटीच्या झाडांची तोड करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्यांमध्ये झालेला विलंब ठरला आहे. पर्यावरण आणि वन मंत्रालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाकडून परवानगी मिळवण्यासाठी दीर्घकाळ लागल्याने प्रकल्पात मोठा खोळंबा झाला.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (MRVC) देण्यात आलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाची नव्याने निश्चित केलेली अंतिम मुदत आता मार्च २०२७ पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रारंभी २०१६ मध्ये प्रकल्प मंजूर करताना कोणतीही स्पष्ट टप्प्यांची आखणी अथवा अंतिम मुदत निश्चित करण्यात आलेली नव्हती. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, त्याची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (CRS) चाचणी होईल आणि यानंतर तो पश्चिम रेल्वेकडे हस्तांतरित केला जाईल.
विरार ते डहाणू दरम्यान रेल्वे सध्या केवळ दोन मार्गांवर धावत आहे. याच मार्गावर लोकल, एक्सप्रेस आणि मालवाहतूक गाड्या धावत असल्याने मोठी गर्दी आणि वेळेचा अचूक ताळमेळ राखण्यास अपयश येत आहे. परिणामी, प्रवाशांना दररोज गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
या प्रकल्पासंदर्भात गेल्या अनेक वर्षांत स्थानिक नागरिक, प्रवासी व सामाजिक संघटनांकडून तक्रारी सातत्याने करण्यात येत आहेत. मात्र, जमीन संपादन, जागेची उपलब्धता, पर्यावरणीय अडथळे आणि स्थानिक समस्या यामुळे प्रकल्पाची गती मंदावली आहे.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही महत्त्वाचे मुद्दे अद्यापही प्रलंबित आहेत. माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तरात स्पष्ट करण्यात आले की, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच चाचणी व हस्तांतरण प्रक्रिया होईल.
विरार ते डहाणू मार्गावरील प्रवाशांसाठी हा चौपदरीकरण प्रकल्प वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. सततच्या विलंबामुळे प्रवाशांना होणारी गैरसोय अधिकच तीव्र होत असून, प्रशासनाने याकडे आता गंभीरतेने लक्ष देणे आणि ठोस कृती करणे गरजेचे आहे.