

विक्रमगड: या वर्षी थोड्या उशिराने पावसाने आगमन केले असले तरी मागील 10 दिवसांपासून चांगल्या प्रकारे पडणाऱ्या पावसाने डोंगराळ भागात उगवणाऱ्या रानभाज्यांची मेजवानीही उपलब्ध करून दिली आहे.
बाजारात नेहमीच्या भाज्यांचे दर चढे असताना विक्रमगड बाजारपेठेत ग्रामीण, आदिवासी भागांतून रानभाज्या आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
विक्रमगड शहराच्या बाजारपेठेत मटार, फ्लॉवर, ढोबळी मिर्ची, घेवडय़ाचे दर प्रतिकिलो शंभर रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कोंथिबिरीची जुडी दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत विकली जात आहे. संततधार पावसामुळे हे दर रोज वाढत आहेत. मात्र याच वेळेला बाजारात दाखल झालेल्या रानभाज्यांनी संसाराचा गाडा हाकणाऱ्या गृहिणींना दिलासा दिला आहे.
पाऊस सुरू झाल्यामुळे शेवळी, बाफली, खुरासनी, माटभाजी, कुरडू, कोलीभाजी, दिंड, आंबड बिंबलीचा पाला या रानभाजा बाजारात आल्या आहेत.
अवघ्या 20 ते 30 रुपयांपर्यंत मिळणाऱ्या रानातील पालेभाज्या घेण्यासाठी ग्राहक विशेष महिलावर्ग विशेष गर्दी करत आहेत. शरीर निरोगी राहण्यासाठी पूर्णपणे सेंद्रीय असणाऱ्या रानभाज्यांचे आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या रानभाज्यांना येथील ग्राहकांनी अधिक पसंती दिली आहे.
आरोग्यास उत्तम रानभाज्या
जंगलात उगविणाऱ्या आणि कुठल्याही रासायनिक खतांची मात्रा नसलेली शेवळी, बाफली, कोलीभाजी, दिंड, आंबड बिंबलीचा पाला, कुरडु, पेंढरा या भाज्यांना खूपच मागणी आहे. विविध आजारांवर आयुर्वेदिक औषधी भाज्या आणि शक्तिवर्धक भाज्या म्हणून अनेक जण या भाज्या आहारात आवडीने खातात.
रानभाज्यांमुळे रोजगार
पाऊस पडल्यानंतर काही काळापुरत्या मिळणाऱ्या या रानभाजा ग्रामीण भागातील अनेक आदिवाशी महिला शहराच्या ठिकाणी सकाळी घेऊन येतात. या रानभाजा दुपारपर्यंत संपवून त्या पुन्हा घरी परततात. या रानभाजांमुळे आदिवासी भागातील महिलांना काही काळ रोजगार उपलब्ध होतो.