

विक्रमगड: विक्रमगड तालुक्यात यंदा उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमानाने 40 ते 42 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्याचे चित्र आहे. दुपारी बारा ते सायंकाळी पाच या कालावधीत शहरात आणि ग्रामीण भागातही अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उन्हाची तीव्रता इतकी वाढली आहे की जणू काही अघोषित संचारबंदीच लागू आहे, असे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड, विविध विकासकामांसाठी झालेले उत्खनन आणि वाढते काँक्रीटीकरण यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळल्याचे जाणकारांचे मत आहे. याचाच परिणाम म्हणून तापमानात झपाट्याने वाढ होत असून स्थानिक पातळीवर उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होत आहेत.
या वाढत्या उष्णतेचा फटका केवळ नागरिकांनाच नव्हे, तर जनावरांनाही बसत आहे. पाण्याच्या शोधात जनावरे भटकताना दिसत आहेत. विहिरी, ओढे आणि तलावांचे पाणी झपाट्याने आटत असल्याने पाण्याची टंचाईही जाणवू लागली आहे.
दरम्यान, विक्रमगड तालुक्यातील आंबा बागायतींवर या उष्णतेचा सर्वाधिक परिणाम होत आहे. तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्याने आंब्याच्या झाडांवरील फळे गळण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी आंब्यांचा आकार कमी राहणे, तसेच फळांची गुणवत्ता घसरणे अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजीपाला पिकांनाही या उष्णतेचा मोठा फटका बसत आहे. जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असल्याने पिके करपू लागली आहेत. पाण्याचा तुटवडा, वाढलेला खर्च आणि कमी उत्पादन या तिहेरी संकटामुळे अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिके सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे.
परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. तज्ज्ञांच्या मते, या परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारण, वृक्षलागवड आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात अशा उष्णतेच्या लाटांचे प्रमाण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक प्रशासनानेही नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले असून, दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे आणि जनावरांसाठी पाण्याची सोय करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.