Water Crisis: वसई-विरारमध्ये तीव्र पाणीटंचाई; प्रभाग 4 आणि 7 मध्ये आठवड्यातून फक्त दोन दिवसच पाणीपुरवठा

विशेषतः झोपडपट्टी आणि दाट वस्तीच्या भागांमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
Water Crisis
Water CrisisPudhari
Published on
Updated on

विरार: वसई-विरार शहर महानगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 4 आणि 7 मध्ये भीषण पाणीटंचाईची समस्या उभी ठाकली असून नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. आठवड्यातून केवळ दोन दिवसच पाणीपुरवठा होत असल्याने स्थानिक रहिवाशांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. विशेषतः झोपडपट्टी आणि दाट वस्तीच्या भागांमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे की, पाण्यासाठी दररोज तासंतास रांगा लावाव्या लागत आहेत. अनेकदा पहाटेपासूनच पाण्याच्या टाक्यांजवळ गर्दी होते, तरीही सर्वांना पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी, घरगुती कामे, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची गरज भागवणे अत्यंत कठीण झाले आहे. काही ठिकाणी तर नागरिकांना पाण्याचे टँकर खरेदी करावे लागत असून त्याचा अतिरिक्त आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.

Water Crisis
Businessman Attack: भिवंडीत व्यावसायिकावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला

प्रभाग 7 मधील सहकारनगर, फुलपाडा, विवेक नगर, जीवनधारा, रामदास पाडा, इतर झोपडपट्ट्या आणि आसपासच्या वस्त्यांमध्ये परिस्थिती अधिक बिकट आहे. अनेक दिवस नियमित पाणी न मिळाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढीस लागली आहे. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी विशेषतः त्रास सहन करावा लागत असून लहान मुलांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

या समस्येमुळे आरोग्याच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत. अस्वच्छतेमुळे आजारांचा धोका निर्माण झाला असून गटारे तुंबणे, साचलेले पाणी आणि अस्वच्छ परिसर यामुळे परिस्थिती आणखी बिघडत आहे. नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिकेकडे तक्रारी नोंदवल्या असल्या तरी अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही, अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. काही तांत्रिक अडचणी आणि पाण्याच्या उपलब्धतेतील कमतरता यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लवकरच अतिरिक्त पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली असून पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news