

कासा : निलेश कासट
डहाणू तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत तवा येथील शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या बहिस्थ (दिवसाला ये-जा करणाऱ्या) विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत घेऊन मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ओलांडावा लागत आहे. शाळेत येताना आणि घरी परतताना भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला सतत धोका निर्माण होत असून, तवा येथे तातडीने पादचारी पूल उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
तवा येथील शासकीय आश्रम शाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शाळा असून 338 विदयार्थी वसतिगृहात राहतात. तर 283 विदयार्थी बहिस्थ (घरून येजा करतात ) असे सुमारे सहाशे च्या अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी अनेक विद्यार्थी वसतिगृहात राहतात, तर तवा, कोल्हाण, धामटणे, घोळ, बऱ्हाणपूर, वांगर्जे, चिंचपाडा आदी परिसरातील मोठ्या संख्येने विद्यार्थी दररोज घरून शाळेत ये-जा करतात. या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी सहा पदरी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ओलांडावा लागतो.
महामार्गावर दिवस-रात्र भरधाव वेगाने धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते. सकाळी शाळेत येताना आणि संध्याकाळी घरी जाताना प्रत्येक वेळी अपघाताची भीती त्यांच्या मनात असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तवा येथे पादचारी पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थ, पालक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सातत्याने केली जात आहे.
विशेष म्हणजे, सुमारे दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी तवा आश्रम शाळेतील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना भरधाव टेम्पोने चिरडल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तत्कालीन प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी यांनी घटनास्थळी भेट देऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे शाळेजवळ पादचारी पूल अथवा उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली होती. मात्र आजपर्यंत त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
दरम्यान, महामार्गालगत शाळा असल्याने यापूर्वी दोन वेळा भरधाव कंटेनर शाळेच्या संरक्षण भिंतीवर आदळून भिंत फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. एका ठिकाणची दुरुस्ती करण्यात आली असली, तरी दुसऱ्या ठिकाणी संरक्षण भिंत अद्यापही तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
"मागील दोन वर्षांपूर्वी तवा शाळेतील दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यावेळी प्रकल्प अधिकारी यांनी ग्रामसभेचा ठराव व मागणीपत्र मागितले होते. आम्ही ग्रामपंचायतीमार्फत मागणीपत्र दिले. तसेच तवा येथे स्वतंत्र उड्डाणपूल व्हावा, अशीही मागणी केली आहे. मात्र आजतागायत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना रोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे."
लहू बालशी, सरपंच, तवा ग्रामपंचायत