

तलासरी : तलासरी: मुंबईअहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत अच्छाड आमगाव, तलासरी ते धूदलवाडी या राष्ट्रीय महामार्गावर उघडी व संरक्षणाविना ठेवलेली गटारे वाहनचालकांसाठी गंभीर धोका निर्माण करत असून अपघाताला आमंत्रण दिले जात आहे. विशेषतः तलासरी पुलालगत असलेल्या सर्विस रस्त्यावर अनेक ठिकाणी गटारांना झाकण नसल्याने तसेच संरक्षक रेलिंग किंवा इशारा फलक नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे एनएचएआय अपघाताची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिक आणि वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.
या मार्गावरून दररोज तलासरी एमआयडीसी परिसरातील विविध कंपन्यांमध्ये कामासाठी जाणारे युवक-युवती, कामगार, व्यापारी तसेच रुग्णवाहिका आणि इतर वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. दिवसभर मोठी वर्दळ असलेल्या या मार्गावर सर्विस रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी उघडी गटारे असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे ही गटारे दिसत नसल्याने दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी मोठा अपघाताचा धोका निर्माण होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करताना पूर्वीची गटारे जशाच्या तशा ठेवण्यात आली आहेत. पूर्वी रस्त्यापेक्षा उंच असलेली गटारे आता रस्त्याच्या पातळीवर आली असून त्यामुळे ती अधिक धोकादायक ठरत आहेत. काही ठिकाणी गटारे पूर्णपणे उघडी असून ती अपघात होऊन अक्षरशः मृत्यूला आमंत्रण देत उभी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
याशिवाय रस्त्याच्या कडेला संरक्षण जाळी बसवण्यासाठी अनेक ठिकाणी खड्डे खोदले जात आहेत. मात्र त्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक, दिशादर्शक चिन्हे किंवा इंडिकेटर लावलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढत आहे.
तलासरी हे मोठे व्यापारी केंद्र असल्याने या परिसरात दिवसभर मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत सर्विस रस्त्यावरील उघडी गटारे आणि खड्डे हे गंभीर अपघातास कारणीभूत ठरू शकतात, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत तलासरी पोलिसांनी ही एनएचआय आणि संबंधित विभागाला पत्र पाठवून धोका लक्षात आणून देऊनही त्या पत्राची दखल घेतली जात नाही. नागरिकांनीही वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करून सर्व उघड्या गटारांवर मजबूत झाकण बसवावीत, आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक रेलिंग उभारावीत तसेच इशारा फलक लावावेत, अशी मागणी केली आहे. गंभीर अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.