

सफाळे : भारतीय रेल्वे अंतर्गत धावणाऱ्या DBRG LTT Exp एक्सप्रेसच्या एसी डब्यात सामान्य प्रवाशांची गर्दी झाल्याने आरक्षित प्रवाशांचे मोठे हाल झाल्याची घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील सुमारे 30 प्रवासी न्यू जलपाईगुडीहून मुंबईकडे 36 तासांचा प्रवास करत होते. मात्र प्रवासादरम्यान त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
प्रवाशांच्या माहितीनुसार, बिहार राज्यातील पटना रेल्वे स्थानकावरून अ/उ 2 टियर च्या अ2 डब्यात तब्बल 30 ते 40 सामान्य प्रवासी जबरदस्तीने चढले. ही गर्दी सुमारे तीन तास पर्यंत कायम होती. त्यामुळे आरक्षित जागा असूनही प्रवाशांना अस्वस्थ वातावरणात प्रवास करावा लागला.
प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की, एसी डब्यात अनधिकृत प्रवाशांचा मुक्त वावर होता. डब्यात स्वच्छतेचा पूर्ण अभाव होता तसेच टॉयलेटची अवस्था अत्यंत खराब झाली होती. रेल्वे प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे चित्र संपूर्ण प्रवासात दिसून आले.
याबाबत प्रवाशांनी रेल्वेकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीती व नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स तसेच रेल्वे प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.