

पालघर: पालघर जिल्ह्यात गेल्या ११ वर्षांत वीज कोसळून तब्बल २७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाढत्या विजेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने ‘वीजेला समजून घेताना’ या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.
जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या चर्चासत्रात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, लातूरचे प्राध्यापक डॉ. प्रमोद पाटील यांनी विजेचा धोका, त्यामागील शास्त्रीय कारणे आणि बचावाचे उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये पालघर जिल्ह्याची स्थापना झाल्यापासून २०२५ पर्यंत वीज कोसळून २७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पूर्वमान्सून आणि मान्सूननंतरच्या काळात जिल्ह्यात विजेच्या घटना अधिक घडत असल्याने नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
वीज पडून मृत्यू झाल्यास शासनाकडून संबंधित कुटुंबाला ४ लाख रुपयांची मदत दिली जाते. मात्र अशा घटना नैसर्गिक आपत्ती म्हणून नोंदवल्या जात असल्याने अनेकदा कुटुंबीय इतर शासकीय लाभांपासून वंचित राहतात. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी व्यापक जनजागृती आणि खबरदारी हाच सर्वात प्रभावी उपाय असल्याचे आवाहन चर्चासत्रात करण्यात आले. वीज पडल्यावर मदत मिळते; पण गेलेला जीव परत येत नाही. त्यामुळे सावध रहा, सुरक्षित रहा हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे काळाची गरज आहे.
जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड ‘हाय रिस्क’ झोन
चर्चासत्रात देण्यात आलेल्या माहितीनुसार, जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड हे तालुके विजेच्या जोखमीच्या दृष्टीने सर्वाधिक संवेदनशील आहेत. तर डहाणू, तलासरी आणि वाडा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा धोका असून वादळी हवामानात वीज पडण्याच्या घटना घडतात.
‘३०-३० फॉर्म्युला’ ठरू शकतो जीवदान
वीज चमकल्यानंतर ३० सेकंदांच्या आत गडगडाटाचा आवाज ऐकू आल्यास वीज पाच किलोमीटरच्या परिसरात पडल्याचे समजावे. अशा वेळी तातडीने सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. तसेच शेवटचा गडगडाट झाल्यानंतरही किमान ३० मिनिटे सुरक्षित ठिकाण सोडू नये, असा महत्त्वपूर्ण सल्ला तज्ज्ञांनी दिला.
१५ ते ४० वयोगटातील पुरुष सर्वाधिक बळी
राज्यात विजेमुळे झालेल्या मृत्यूंच्या अभ्यासात १५ ते ४० वर्षे वयोगटातील पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. जनजागृतीचा अभाव, हलगर्जीपणा आणि सुरक्षित सुविधांची कमतरता ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे नमूद करण्यात आले.