

पालघर: गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासनाकडून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली. पालघरच्या अप्पर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.
शनिवार, रविवार आणि अनंत चतुर्थीच्या (ता.२५) दिवशी सायंकाळी चार वाजल्यापासून गणेश विसर्जन मिरवणुका संपेपर्यंत मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर येत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातून मुंबई, ठाणे, गुजरात तसेच नव्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांची संख्या मोठी असल्याने वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुजरात बाजूकडून घोडबंदर, वसई, ठाणे, मुंबई, नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना काही काळासाठी प्रवेश बंद राहणार आहे. बंदी कालावधीत अच्छाड नाका, चारोटी टोलनाका ते मनोर दरम्यान असणारे हॉटेल, ढाबे, पेट्रोल पंप तसेच सुरक्षित पार्किंगच्या ठिकाणी अवजड वाहने थांबविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
अत्यावश्यक सेवांना सूट
वाहतूक नियंत्रण अधिसूचनेतून अत्यावश्यक सेवांमधील वाहनांना सूट देण्यात आली आहे. यामध्ये पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका, उपविभागीय व तालुका दंडाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली वाहने तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस आणि इतर अत्यावश्यक सेवांची वाहने यांचा समावेश आहे.
प्रशासनाने वाहनचालकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, गणेश विसर्जनाच्या काळात पर्यायी नियोजन करून प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकांच्या काळामध्ये
महामार्गावर होणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी पोलीस प्रशासन व वाहतूक विभागाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.