

पालघर ः मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या दुर्वेस गावाच्या हद्दीतील वैतरणा नदी पात्रादरम्यान तुटलेली वीज वाहिनी जोडण्यात अपयश आल्याने ढेकाळे फिडरवरील हजारो ग्राहकांना 32 तास विजे अभावी काढावे लागले.
बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास वीज वाहिनी तुटल्याने ढेकाळे फिडरचा वीज पुरवठा खंडित झाला होता. सूर्या नदी पात्रातील वीज वाहीन्यांवर अडकलेले गवत काढण्यासाठी एनडीआर एफच्या पथकाला पाचारण करणारी महावितरणमुळे वीज वाहिनी जोडण्याच्या काम तीस तास रखडल्याने वीज ग्राहकांची गैरसोय झाली. बुधवारची रात्र नवरात्रौत्सवातील शेवटची रात्र होती, विजे अभावी व गरबा रसिकांचा हिरमोड झाला. दुरुस्ती कामाच्या नियोजनात जबाबदार शाखा अभियंता तसेच उपविभागीय अभियंत्यां -विरोधात कारवाईची मागणी वीज ग्राहकांकडून केली जात आहे.
तीन वर्षांपूर्वी जुलै महिन्यात वैतरणा नदीला पूर आल्याने वीज वितरण वाहिन्यांचे नदीकाठचे खांब कलंडून वीज वाहिन्या नदीपात्रात वाहून गेल्या होत्या. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे नदी पात्रा दरम्यानच्या वीज वाहिन्या जोडण्यासाठी महावितरण कंपनीकडून एनडीआरएफच्या पथकाची मदत घेण्यात आली होती. एनडीआरएफच्या जवानांनी स्पीड बोटच्या साहाय्याने वीज वाहिन्या नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहातून पलीकडे पोहोचवण्याचे काम पूर्ण केले होते.
बुधवारी पहाटे सावरखंड उपकेंद्रात बिघाड झाल्याने वैतरणा नदी पात्रादरम्यानच्या तीन पैकी एक वीज वाहिनी तुटून नदीपात्रात पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. दुरुस्तीच्या कामा दरम्यान नदी पात्रातील पाण्याच्या प्रवाहातून पात्राच्या पलीकडे विजवाहिनी नेण्याच्या कामासाठी दोरखंडाच्या साहाय्याने वीज वाहिनी पलीकडे नेण्यात आली, परंतु वीज वाहिनी ओढताना वीज वाहिनी नदी पात्रातील खडकात अडकून पडल्याने वीज वाहिनी खांबावर बांधण्यात अपयश आले. नदी पात्रातील पाण्याचा प्रवाहात वाढ झाली होती, तसेच रात्र झाल्याने वीज वाहिनी ओढण्याचे काम बंद करण्यात आले.
वीज पुरवठा सुरळीत
गुरुवारी सकाळी नदीपात्रातील वीज वाहिनी ओढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने रबरी टायर ट्यूबच्या सहाय्याने खडकात अडकलेली वीज वाहिनी काढण्यात यश आले. अकरा वाजण्याच्या सुमारास वीज वाहिनी ओढून खांबाला जोडण्यात यश आले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दुरुस्तीची कामे पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.