तलासरी : शेतीच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचा व संशयाचा राग मनात धरून आपल्याच चुलत भावाची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला पालघर अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने 3 जुलै 2026 रोजी दोषी ठरवून जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. यासोबतच आरोपीला एकूण 10 हजार 500 रुपयांचा आर्थिक दंडही ठोठावण्यात आला आहे.
सदर संपूर्ण घटना, तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमगांव शिवपाडा येथील रहिवासी असलेला आरोपी राजेश रूपजी डोल्हारे वय 35 वर्षे याचे त्याचे चुलत भाऊ मयत वसंत रूपजी डोल्हारे यांच्यासोबत शेतीच्या कारणावरून नेहमी भांडण होत असे. 7 मार्च 2020 रोजी मयत वसंत हे त्यांच्या मुलीला, तुला एकटाच भाऊ आहे, त्याला रडवू नकोस असे समजावून सांगत होते. मात्र, आरोपी राजेशने मयत वसंत हे आपल्यालाच बोलत आहेत, असा संशय मनात आणला याच रागातून आरोपीने वसंत यांना घराबाहेर बोलावून त्यांच्या मानेवर आणि डाव्या कानावर कुऱ्हाडीने जबर वार केले. ज्यामध्ये वसंत यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 55/2020५५ भा.दं.वि. कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी कौशल्याने तपास आणि दोषारोपपत्र नंतर या गंभीर गुन्ह्याचा प्रथम तपास तलासरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उप निरीक्षक सागर पाटील यांनी केला. त्यानंतर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश रोठे यांनी करून आरोपीविरुद्ध भक्कम तांत्रिक व परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले. तत्कालीन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पालघर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या गुन्ह्यात 11 साक्षीदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली असून मा. अपर जिल्हा व सत्र न्यायालय, पालघर-1 च्या न्यायाधीश ए.आर.रहाणे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी अत्यंत प्रभावीपणे बाजू मांडली. कोर्टात एकूण 11 साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली.