

दीपक गायकवाड - खोडाळा
पालघर जिल्ह्यात आजही अनेक दुर्गम भाग मुलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. दरम्यान सध्या काळाची गरज असलेल्या मोबाईल नेटवर्कपासूनही येथील जनता वंचित असल्याचे चित्र आहे. खोडाळा आणि परिसरात नो नेटवर्कने ग्रामीण आदिवासी पट्ट्यातील ग्राहकवर्ग अतिशय बेजार झाला होता.बीएएनएलच्या नन्नाच्या पाढ्याला अक्षरशः कंटाळुन येथील ग्राहकवर्ग केवळ नाविलाजास्तव खाजगी सेवेकडे वळला होता.
ही बाब लक्षात घेऊन अखेर बी एस् एन् एल् ने मौजे सायदे, कोचाळे, सूर्यमाळ, सावर्डे, करोळ, कारेगाव, काष्टी, आमला या 8 ठिकाणी बी एस् एन् एलचे टॉवर उभे केले असल्याचा सार्वजनिक उहापोह करत बी एस् एन्एल्चे मुळ ग्राहक पुन्हा बी एस् एन् एल् कडे आकृष्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता.परंतु त्याउपरांतही दुरध्वनी सेवेत काडीमात्रही बदल झालेला नाही.या एकंदरीत घडामोडी नंतरही ईप्सित साध्य न झाल्याने बी एस् एन् एलने फक्त गाजरच हाती दिल्याची तीव्र लोकभावना ऐकायला मिळत आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात आज सर्व काही सोपे आणि सुरळीत झाले असून त्यासाठी इंटरनेट सेवा अत्यावश्यक बनलेली आहे. मात्र हीच भारत संचार निगम ची नेटवर्क सेवा सातत्याने कोमात जात असल्याने असंख्य ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे. वारंवार कळवूनही बी एस एन एल सेवेत तीळमात्रही सुधारणा झालेली नाही. परंतू मोठ्या पाठबळ व्यवस्थेचे धनी असूनही सेवेत आमूलाग्र बदल संभवला नाही.हे खेदजनक असतांनाही बी एस एन एल सेवेने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून ग्राहकांना सुलभ सेवेपासून अनियमित काळ वंचित ठेवले आहे.त्यामूळे बी एस् एन् एल सेवेच्या ग्राहकांना विकतचा मनस्ताप होत आहे.
मागील 2 वर्षा पासून बी एस एन एल चे नेटवर्क प्रदीर्घ काळ गायब होत आहे. त्यामुळे त्याच्या वर अवलंबून असलेल्या सर्व सोयीसुविधांचा अक्षरशः बट्ट्याबोळ उडालेला असल्यामुळे ग्राहकांना त्याचा त्रास होत आहे.भारत संचार निगमने ग्राहकांसाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. अखंडीत व मजबूत सेवा देण्यासाठी आपली पकड मजबूत करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे बहुसंख्य ग्राहकवर्ग बी एस एन एल कडे आकर्षित झाला आहे.मात्र असे असले तरीही नेटवर्कच अनियमित काळ बेपत्ता होत असल्याने बी एस एन एल चे सर्वच दावे हे फुसका बार ठरत असून ग्रामीण पटटयातील ग्राहकांची त्यामुळे फारच कुचंबणा होत आहे.
भारत संचार निगम ही देशातील एक अग्रगण्य अशी दूरसंचार सेवा असून उत्कृष्ट सेवेसाठी परिचीत आहे.तसेच या सेवेची व्याप्ती मोठी आहे.तथापी वारंवार सेवा खंडीत होणे, सलग 15-15 दिवस नेटवर्क गायब होणे यामूळे बी एस एन एल ची उत्कृष्ट सेवेची ओळख पुसट होत चालली आहे.सेवेतील विस्कळीत पणा बाबत सातत्याने वरिष्ठांकडे तक्रारी करुन देखील सुरळीत व अखंड सेवा देण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत.
सावर्डे गावांत बी एस् एन् एल् ने टॉवर टाकले आहेत.सेवा सुरळी सुरू राहावी म्हणून त्यासाठी आम्हीही सहकार्य केले आहे.परंतु बी एस् एन् एल् ची दुरध्वनी सेवा ही अक्षरशः मोडकळीस आल्याचे चिन्ह ग्रामीण भागात दिसून येत आहे.वास्तविकतः ग्रामीण भागात कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने किमान संपर्क साधने आवश्यक असल्याने भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन निरनिराळ्या 8 ठिकाणी टॉवर बसवण्यासाठी योग्य ते सहकार्य केलेले आहे.परंतु बी एस् एन् एल् सेवा सरळ होत नाही.
हनूमंत पादीर, उपसरपंच,सावर्डे ग्रामीण