

पालघर : हनिफ शेख
पालघर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्ह्यातील अनेक विकास कामे गेल्या कित्येक वर्षानुवर्षे होत आलेली आहेत यासाठी संबंधित विभाग जिल्हा नियोजन समितीकडे मागणी करतो आणि नियोजन समिती आवश्यकतेनुसार त्याला निधी देते. यामध्ये शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत, पाणीपुरवठा, लघुपाट बंधारे विभाग अशा अनेक विभागांचा समावेश असतो.
आजवर या विभागाकडून राबविण्यात आलेल्या योजनांना कोट्यवधीचा निधी देण्यात आलेला आहे. मात्र नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ इंदूराणी जाखड यांनी अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घातला असून जसे की लघुपाटबंधारे विभागाला आम्ही वाढीव निधी देतो मात्र ही काम करताना त्याचा खर्च ,सिंचनाला किती फायदा झाला असा सवाल केला. यापुढे या विभागाला निधी देताना कामे मंजूर करताना ते काम झाल्यानंतर त्याचा सिंचनासाठी किती फायदा होणार आहे. या बाबी प्रकर्षाने समोर आणून दिल्यानंतरच त्या विभागाला वाढीव निधी मिळेल असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.
या बैठकीत प्रतिनिधिक स्वरूपात लघुपाटबंधारे विभागाचे नाव जरी घेतले असले तरी देखील नियोजन समितीकडून आज पर्यंत मंजूर करण्यात आलेल्या विविध विभागाच्या कामांचा सर्वसामान्य जनतेला तिथल्या शेतकऱ्यांना काय फायदा झाला याचा जर अभ्यास केला असल्यास प्रत्यक्ष नागरिकांना फायदा कमी आणि ठेकेदार अधिकाऱ्यांना त्याचा फायदा अधिक झाल्याचे निदर्शनास येईल असे चित्र संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे.
कारण आज जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांमुळे पाणीटंचाईचा आकडा कमी झाला आहे मात्र वर्षानुवर्ष या ठिकाणी लघुपाटबंधारे विभागाकडून करण्यात येणारे कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधारे छोटे पाझर तलाव याचा त्या बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या शेजारील शेतकऱ्यांना तरी लाभ झाला का याचा सखोल तपास होणे आता आवश्यक बनले आहे.
जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग ग्रामीण भागात शेतीसाठी सिंचन सुविधा निर्माण करतो आणि भूजल पातळी वाढवण्याचे काम करतो. हा विभाग ० ते २०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या लहान प्रकल्पांची निर्मिती, देखभाल आणि दुरुस्ती करतो यामध्ये कोल्हापूर पद्धतीचे बंधारे (को. प. बंधारे) बांधतात उथळ नद्या किंवा नाल्यांवर हे बंधारे बांधले जातात, ज्यामध्ये पावसाळ्यानंतर वाहून जाणारे पाणी अडवून सिंचनासाठी वापरले जावे हा उद्देश असतो.
दुसर म्हणजे पाझर तलाव आणि साठवण तलाव याचा उद्देश म्हणजे भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि शेतीला सिंचन पाणी पुरवण्यासाठी तलावांची निर्मिती करणे हा होय तिसरा महत्त्वाचा नाला बांधकाम (CNB) यामध्ये वाहत्या पाण्याचा वेग कमी करून ते जमिनीत मुरवण्यासाठी सिमेंटचे बंधारे बांधले जातात. उपसा सिंचन योजना: विशेषतः आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या पूर्ण खर्चाने उपसा सिंचन योजना राबविल्या जातात.
सिंचन क्षेत्र वाढावे यासाठी या काबांना अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे आजवर या कामावर अनेकदा जेवढी मागणी त्यापेक्षा अधिक निधी देण्याचा प्रयत्न नियोजन समिती विभागाकडून झाल्याचे दिसून येते मात्र आता याचा नक्कीच फायदा सिंचनासाठी किती झाला हा संशोधनाचा भाग असला तरी यापुढे या विभागाला निधी देताना त्या कामाचे महत्त्व त्या विभागाने जिल्हाधिकारी तथा नियोजन समिती यांना पटवून देणे आवश्यक आहे .
याशिवाय त्या कामामुळे तेथील किती शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. किती शेतजमीन सिंचनाखाली येणारे तेथील आजूबाजूच्या विहिरींना त्यामुळे पाणी येणार आहे की नाही येणार आहे. अशा स्वरूपाच्या सगळ्या बाबी तपासूनच त्या कामासाठी निधी मिळणार असल्याचे शुतोवाच जिल्हाधिकारी जाखड यांनी या नियोजन समितीच्या बैठकीत केल्यामुळे या निर्णयाचे स्वागत होत आहे.
उन्हाळ्यात सिंचन क्षेत्र वाढवणे सोडा भर पावसाळ्यात लागते गळती
कोल्हापुरी बंधारे असतील की सिमेंट बंधारे यांचा प्रमुख उपयोग हा पाणी आडवा पाणी जिरवा या व्याख्या खाली येत असतानाही जवर केलेल्या अशा बंधार्यांमधून पाणी किती आणले याचा तपास केल्यास पाण्याऐवजी पैसा आडवा आणि पैसा जिरवा ही संकल्पना या विभागातील अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी राबविली आहे. काय असा सवाल उपस्थित होईल असे चित्र दिसून येते. खरंतर अशा बंधाऱ्यांचा उपयोग उन्हाळ्यात जास्त होतो कारण की हे साचलेले पाणी जमिनीत मुरल्यामुळे आजूबाजूच्या अनेक विहिरींना देखील पाणी राहते याशिवाय त्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी देखील या पाण्याचा उपयोग होतो मात्र पाणी अडवून जिरविण्यासाठी असलेले हे बंधारे उन्हाळ्यात सोडा पावसाळ्यातच यांना गळती लागल्याची अनेक उदाहरणे पालघर जिल्ह्यात दिसून येतील.