

पालघर शहर: खासगी ठेकेदारांमार्फत शासकीय धान्य पुरवठ्याचे काम करून घेण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात माथाडी कामगारांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयसमोर दोन दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले सुरू केले आहे.
अखिल भारतीय माथाडी सुरक्षारक्षक, श्रमजीवी आणि जनरल कामगार युनियनच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले असून यावेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.
सरकारच्या या निर्णयामुळे मथाडी कामगारांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असून सदर निर्णय मागे घेण्यात यावा, नोंदीत मथाडी कामगारांकडूनच ही कामे करून घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शासकीय धान्य गोदामातील धान्याची चढ - उतार करणे, पोत्याची थप्पी लावणे ही कामे जिल्हा माथाडी मंडळातील नोंदीत कामगार करतात. मात्र खासगी ठेकेदारांमार्फत रेशन दुकानांना थेट धान्य पुरवठा करण्याच्या दृष्टीने शासनाची ठेकेदाराच्या माध्यमातून धान्याच्या पोत्यांची थेट वाहतुक करुन ती परस्पर शिधावाटप दुकानांमध्ये पोहोचती करणे, पोत्यांचे वजन करून ती उतरवून देणे, दुकांनामध्ये त्यांची थप्पी लावून देणे ही कामे वाहतूक कंत्राटदारांच्या अनोंदित कामगारांकडुन करुन घेण्याबाबत शासनाने 21 व 24 एप्रिल, 2026 रोजी आदेश जारी केले.
यामुळे शासकीय गोदामांमध्ये धान्यच येणार नाही व परिणामी गेली कित्येक वर्षे हे काम करणारे जिल्हा माथाडी मंडळातील नोंदीत माथाडी कामगार कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार असून हे कामगार बेरोजगार होण्याचा धोका आहे.
त्यामुळे निर्णय शासनाने मागे घ्यावा आणि संबंधित गोदामातील कार्यरत नोंदीत माथाडी कामगारांकडूनच सदरची कामे करून घेण्यात यावे अशी मागणी या दोन दिवसीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.