Borivali Virar rail corridor : बोरिवली - विरार पाचव्या- सहाव्या मार्गिकेचे काम संथगतीने

दोन वर्षांत केवळ अठरा टक्केच काम पूर्ण! प्रवासी प्रतीक्षेत
Borivali Virar railway project
बोरिवली - विरार पाचव्या- सहाव्या मार्गिकेचे काम संथगतीने pudhari photo
Published on
Updated on

विरार ः मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर उपनगरी आणि लांब पल्ल््याच्या रेल्वेगाड्यांमधील गर्दी कमी करून गाड्यांची वेळबद्धता सुधारण्यासाठी बोरिवली ते विरार दरम्यान स्वतंत्र दोन मार्गिका उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला होता. सुमारे 2,184 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची कामे दोन वर्षांपूर्वी सुरू झाली असली तरी आतापर्यंत केवळ अठरा टक्केच काम पूर्ण झाले आहे. एकूण सव्वावीस किलोमीटर लांबीच्या या नव्या मार्गिकेमुळे रोज प्रवास करणाऱ्या 35 लाखांहून अधिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र अपेक्षेप्रमाणे या कामाचा वेग मंदावलेला दिसतो आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. त्यामुळे रेल्वे सेवांमध्ये होणारे विलंब, गर्दी आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात जमीन संपादनातील अडथळे, पर्यावरणीय परवानग्यांचा विलंब आणि न्यायालयीन स्थगिती यांसारख्या विविध कारणांमुळे या कामाची गती अत्यंत संथ झाली आहे. एका महत्त्वाच्या पुलाच्या बांधकामावर न्यायालयाने घातलेली स्थगिती नुकतीच उठविण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.

Borivali Virar railway project
Konkan fishermen crisis : वादळावर वादळ; कोकणातील मच्छीमार पुन्हा संकटात!

प्रकल्पासाठीचा सविस्तर आराखडा मंजूर झाला असून सर्वेक्षणासाठी हवाई नकाशे तयार करण्यात आले आहेत. प्रमुख पुलांचे आराखडे मान्य झाले असून दोन महत्त्वाच्या पुलांवर प्रत्यक्ष बांधकाम सुरू आहे. तसेच दहिसर ते वसईदरम्यानच्या मातीच्या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. परंतु, काही खासगी जमिनींचे अधिग्रहण अद्याप बाकी आहे. आवश्यक असलेल्या एक दशांश ऐंशी एक हेक्टर जमिनीतून एक दशांश चाळीस हेक्टर जमीनच आतापर्यंत हस्तांतरित झाली आहे, तर उर्वरित जमीन न्यायालयीन वादात अडकलेली आहे. याशिवाय तेरा दशांश बासष्ट हेक्टर मिठागर क्षेत्रातील जमीन अधिग्रहण आणि पर्यावरणीय परवानगीसाठी अद्याप प्रलंबित आहे.

पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने या प्रकल्पाला पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मंजुरी दिली आहे. मात्र मँग्रोव्ह म्हणजेच दलदलीतील झाडांच्या परिसरात होणाऱ्या कामासाठी न्यायालयाने आणि मँग्रोव्ह संरक्षण विभागाने कडक अटी लादल्या आहेत. त्या अटींनुसार प्रतिपूरक वृक्षारोपण तसेच सातत्याने देखरेख आणि नोंदी ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे या परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया वेळखाऊ ठरली आहे.

Borivali Virar railway project
Solar power project : एसटीच्या मोकळ्या जागेवर सौरऊर्जा प्रकल्प

दहिसर, नायगाव आणि नालासोपारा स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी पादचारी पूल आणि फलाट वाढविण्याची कामे सुरू आहेत. या कामांमुळे काही ठिकाणी प्रगती दृश्यमान झाली असली तरी संपूर्ण प्रकल्पाचा वेग अजूनही अपेक्षित पातळीपर्यंत पोहोचलेला नाही. या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यास पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा ताण कमी होईल, गाड्यांची धाव वेळेत होईल तसेच अपघातांची शक्यता घटेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

रेल्वे विकास महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “गेल्या काही महिन्यांत आम्ही अनेक अडथळ्यांवर मात केली आहे. पुलाच्या कामावरील स्थगिती उठली असून पर्यावरणीय परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र पुढील बारा महिने या प्रकल्पासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. या काळात जमिनीचे प्रश्न सुटले आणि सर्व परवानग्या पूर्ण झाल्या, तर कामाचा वेग वाढविणे शक्य होईल.”

प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा

या प्रकल्पामुळे मुंबई-पश्चिम उपनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. दररोज कोट्यवधी प्रवाशांना भेडसावणाऱ्या गर्दी, विलंब आणि असुविधांचा त्रास कमी होईल. वेळबद्ध आणि सुरक्षित प्रवासासाठी ही दोन नवी मार्गिका अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, असा आशावाद रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news