

बोईसर : बोईसर परिसरातील वंजारवाडा येथे प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात सर्व्हे करण्यासाठी अधिकारी दाखल झाल्यानंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. स्थानिक ग्रामस्थांनी या सर्व्हेला तीव्र विरोध दर्शवत प्रशासनाला धारेवर धरले असून, “आम्हाला उड्डाणपूल नव्हे तर भुयारी मार्ग हवा,” अशी ठाम भूमिका घेत गाव बचाव संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पामुळे वंजारवाडा परिसरासह स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होणार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उड्डाणपूल उभारण्यात आल्यास नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागेल, तसेच विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि कामगार वर्गाला गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या परिसरासाठी उड्डाणपूलापेक्षा भुयारी मार्ग हा अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि स्थानिकांच्या दैनंदिन गरजांना पूरक पर्याय ठरू शकतो. त्यामुळे कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी प्रशासनाने स्थानिक नागरिकांची मते जाणून घ्यावीत, ग्रामसभेच्या माध्यमातून चर्चा घडवून आणावी आणि स्थानिकांच्या सूचनांचा विचार करूनच पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून सर्व्हे प्रक्रिया राबविण्यासाठी अधिकारी पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, सर्व्हेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी जोरदार विरोध नोंदविला. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांच्या रोषामुळे सर्व्हे पथकाला अडचणींचा सामना करावा लागल्याची माहिती समोर आली आहे.
या आंदोलनात वंजारवाडा, होळीपाडा, सुतारपाडा आणि दांडीपाडा येथील ग्रामस्थांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. नागरिकांनी घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. “विकासकामांना आमचा विरोध नाही, मात्र स्थानिक नागरिकांच्या हिताचा बळी देऊन विकास नको,” अशी भूमिका ग्रामस्थांनी स्पष्ट केली.
दरम्यान, या विषयावर प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात पुढील काळात होणाऱ्या चर्चेकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून, विकासकामे आणि स्थानिक हित यामध्ये समतोल कसा साधला जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.