

मोखाडा : आजही ग्रामीण भागातील आदिवासी समाजातील वेगवेगळ्या जाती जमाती मधील लोक काही सण, उत्सव तेवढ्याच परंपरेने अणि श्रध्देने साजरे करतात अशाच सणा पैकी एक बिजा हा सण होय. बिजा हा सण तालुकानिहाय वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जात असला तरी शक्यतो माघ महिन्यातील नव्या चांदावर आणि वसंत पंचमीच्या दिवशी साजरा करण्याची परंपरा आहे. या सणाला नवीन पालवी, फुले, फळे तसेच आंब्याचा मोहोर डाळीत टाकून खाण्याची परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामीण भागात सुरू आहे.
माघ महिना म्हणजे वसंत ऋतुची सुरुवात होत असून झाडांना नवीन पालवी फुटण्यास याच महिन्यात सुरवात होते. अशा माघ महिन्यातील नव्या चांदावर आणि वसंत पंचमीच्या दिवशी ग्रामीण भागात बिजा हा सण पकडला जातो. या दिवशी आदिवासी समाजातील नागरिक निसर्गातील नव्याने आलेली पालवी, फुले, फळे तसेच आंब्याचा मोहोर डाळीत टाकून शिजवून खाण्याची परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून चालवीत आलेला आहे.
त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या संत निवृत्तीनाथांच्या यात्रेत जावून तेथून गुळ विकत आणून तो बिजा सणाच्या दिवशी तांदळाच्या पिठाचे उंडे (लाडू) तयार करून त्यात घालतात आणि गोडधोड करुन आपल्या कुटुंबाला आणि जे पुर्वज आपल्यातून निघून गेलेले आहेत त्यांना नैवेद्य म्हणून ठेवतात अशी पिढीजात पंरपरा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असल्याचे आदिवासी बांधव सांगतात. तर बिजा सण झाल्यानंतर लग्न कार्याला सुरुवात होत असल्याची माहिती सुद्धा आदिवासी बांधवांनी बोलताना सांगितली आहे. यामुळे एका बाजूला समाजात नव नवीन सण वार नव्या पध्दतीने साजरे करण्याची चढाओढ लागलेली असताना ग्रामीण भागात मात्र रुढी पंरपरा आजही तेवढ्याच श्रध्देने पाळल्या जातात हे वैशिष्ट्य गाव पाड्यात पाहायला मिळत आहे.