

तलासरी: निसर्गात, चैत्राचा महिना सुरु झाला की अनेक प्रकारची झाडे बहरतात. त्यात भारतीय कुळातील पिवळ्या धमक फुलांचा आणि पावसाचा इंडिकेटर म्हणून परिचित असलेला बहावा यंदा बहरला असून बहरलेला मनमोहक बहावा पाहतांना नेत्रसुख मिळते. बहावा बहरल्याने यंदा पाऊस चांगला पडणार असल्याचे यातून संकेत मिळत असल्याचे बोलले जात आहे.
निसर्गातील प्राणी, पक्षी व वनस्पती भविष्यात घडणाऱ्या घटनांचा वेळोवळी संकेत देत असतात याला वैज्ञानिक आधार नसले तरी एक प्रचलित मान्यता आहे. पिवळ्या धमक फुलाने बहरलेल्या या झाडाला मराठीत बहावा म्हणतात तर शास्त्रीय नाव कैशिला पिस्टूला हे नाव त्याच्या शेंगावरुन पडले. असे असले तरी फुलांच्या सोनेरी रंगावरुन गोल्डन शोवर ट्री म्हणूनही ओळखले जातो.
+पुर्वीच्या काळी पावसाचा अंदाज घेण्यासाठी कोणतेही साधने व अधुनिक यंत्रसामुग्री नव्हती, की हवामान शास्त्रही नव्हते. निसर्गच पावसाचा अंदाज देत असे. निसर्गातील प्रत्येक झाड त्याला येणारी फुले, फळे हे विशिष्ट कालावधीतच येत असतात. ते वेगवेगळ्या ऋतूचे संकेत समजले जाते. त्यामुळे त्या काळी चैत्र महिण्यात बहरणाऱ्या विविध वनस्पतीच्या झाडावरुन पावसाचे संकेत मिळत असतात.
यंदा बहावा सर्वत्र बहरला आहे. यावरुन यंदा पाऊस चांगला होईल असे संकेत मिळत आहेत. आताच्या वैज्ञानिक युगात प्रगत तंत्रज्ञानामुळे प्रत्येक गोष्टीची पुर्व कल्पना मिळत असली तरी शेतकरी अदिवासी समाज पाऊस वेळेवर येणार का उशीरा याचा अचूक अंदाज बांधतात. त्यामुळे अनादीकाळापासून निसर्गच नैसर्गिक बदलाचा व पावसाचा अंदाज देत असतात. बहावा हिवाळ्यात पर्णहीन असतो तर मार्च ते मे महिन्यात पुर्णतः फुलून येतो.
ग्लोबल वॉर्मिंगचा झाडांवर परिणाम
वातावरण बदलामुळे निसर्गाच्या चक्रात गंभीर आणि दूरगामी बदल होत आहेत. प्रामुख्याने मानवी हस्तक्षेप आणि हरितगृह वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे हे बदल दिसून येत आहेत. जागतिक तापमानवाढ यामुळे जमिनीचे आणि समुद्राचे तापमान सातत्याने वाढत आहे.ऋतूचक्रातील अनिश्चितता: ऋतू आणि हंगाम अनियमित झाले आहेत. अचानक येणारा अवकाळी पाऊस, गारपीट आणि कडाक्याची थंडी अशा घटनांची वारंवारता वाढली असून त्याचा परिणाम निसर्गावर होत आहे.