पालघर/कासा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तवा येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कंटेनर थेट तवा आश्रम शाळेच्या संरक्षक भिंतीला धडकून आश्रम शाळेच्या आवारात शिरला. या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आठ-दहा दिवसांपूर्वी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना भरधाव ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना ताजी असताना असाच भरधाव कंटेनर तवा आश्रम शाळेच्या आवारात शिरल्याने आश्रम शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सध्या काँक्रीटचे काम सुरू असले तरी ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांना अचानक ब्रेक लावावे लागत आहेत. ज्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. या अपघातांची मालिका रोखण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अपयशी ठरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.