जळगाव; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वाघूर धरणाचे २० दरवाजे यंदा प्रथमच उघडण्यात आले. वाघूर नदीच्या उगमस्थळी झालेल्या दमदार पावसामुळे वाघूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी या धरणाचे प्रथम यंदाच्या पावसाळ्यात सर्व २० दरवाजे उघडण्यात आले. धरणातून ४९ हजार ६१८ क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे.
वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने २८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले. पाण्याच्या विसर्गामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाघूर धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे वाघूर धरण १०० टक्के भरले आहे.
पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी मध्यम प्रकल्पाचे आज सकाळी साडेसात वाजता धरणाचे ९ दरवाजे ०.१५ मीटरने उघडून ४०५९ क्युसेक विसर्ग नदी पात्रात सुरु आहे. तर मोर मध्यम प्रकल्पाचे दोन दरवाजे ३ सें. मी. उघडण्यात आले आहेत. हिवरा, अग्नावती, मंगरूळ आणि तोंडापूर मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.