

येवला : पुढारी वृत्तसेवा
दिवसभराच्या उकाड्यानंतर गुरुवारी सायंकाळी ६च्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसाने शहर व ग्रामीण भागात पिकांसह, घरांचे नुकसान झाले आहे.
गुरुवारी (दि.२१) सायंकाळी ६च्या सुमारास ढग दाटून आल्याने सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून शहर व परिसराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत संपूर्ण परिसर अंधारात होता. या मान्सूनपूर्व वादळाचा फटका फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना बसला.
सध्या आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, झाडांना लागलेले आंबे काढणीला आले आहेत. यात आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, उन्हाच्या तीव्र चटक्यांनी हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, अचानक झालेल्या पावसाने बाजारात आलेल्या नागरिकांची, व्यापाऱ्यांची आणि वाहनधारकांची प्रचंड पळापळ झाली.