

येवला : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आणि अप्रतिम कलाकुसरीची जागतिक ओळख असलेल्या येवला पैठणीच्या शिरपेचात आणखी एक ऐतिहासिक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयोजित १० व्या राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्यात भारताच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येवला पैठणीच्या गौरवार्थ विशेष टपाल तिकीट अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आले.
हा सुवर्णक्षण येवला शहरासह संपूर्ण राज्याच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद ठरला आहे. सोहळ्यात राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते 'संत कबीर हातमाग पुरस्कार' आणि 'राष्ट्रीय हातमाग पुरस्कार २०२५' प्रदान झाले.
येवल्याची ओळख देशाच्या वस्त्रोद्योगाच्या नकाशावर अधिक ठळक व्हावी आणि पैठणी उद्योगाला आधुनिक काळानुसार नवी दिशा मिळावी, यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ सातत्याने प्रयत्नशील आहेत.
पैठणी हा येवल्याच्या अर्थव्यवस्थेचा पाया असून, या उद्योगाशी हजारो विणकर, कारागीर, व्यापारी आणि विविध घटक जोडलेले आहेत. त्यामुळे पैठणी उद्योगाचा विकास म्हणजे केवळ एका पारंपरिक कलेचा विकास नसून, हजारो कुटुंबांच्या रोजगाराला आणि आर्थिक स्थैर्याला बळ देणे आहे, या दृष्टिकोनातून येवल्यातील पैठणी उद्योगाला आधुनिक सुविधा, बाजारपेठ, पर्यटन आणि रोजगाराशी जोडण्यासाठी विविध उपक्रमांना चालना देण्याचे काम मंत्री भुजबळ यांच्या माध्यमातून होत आहे.
हातमागावर तासन्तास बसून अत्यंत संयमाने आपल्या कलाकुसरीने येवला पैठणीवर मोर, कमळ, बुटी, ब्रोकेट मुनिया आणि यांसारखी विविध मनमोहक नक्षी विणणाऱ्या येवल्याच्या विणकर बांधवांचा हा सर्वोच्च बहुमान आहे. पूर्वजांकडून मिळालेला हा पारंपरिक वारसा जपत अखंड मेहनत करणाऱ्या कारागिरांच्या कष्टाची ही खरी राष्ट्रीय पावती आहे. टपाल तिकिटाच्या माध्यमातून आता येवला पैठणीचे सौंदर्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार असून, तिची ब्रँड ओळख जागतिक स्तरावर अधिक मजबूत होणार आहे.
राष्ट्रपती भवनातून मिळालेल्या या राष्ट्रीय गौरवामुळे येवला पैठणीसाठी ई-कॉमर्स, डिजिटल मार्केटिंग, फॅशन डिझायनिंग आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांचे नवे दरवाजे उघडले आहेत. हा सन्मान केवळ भूतकाळातील परंपरेचा गौरव नसून, येवल्याच्या पैठणी उद्योगाला उज्ज्वल भविष्याकडे नेणारा एक भक्कम पाया ठरणार आहे.
येवल्याचा हातमाग उद्योग अधिक सक्षम करण्यासाठी आणि विणकर कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जात आहेत. येवल्याला 'पैठणी नगरी' म्हणून पर्यटनाच्या नकाशावर ओळख असून, देश-विदेशातील पर्यटकांना पैठणी विणकामाची प्रत्यक्ष प्रक्रिया पाहता येईल आणि कारागिरांकडून थेट खरेदीचा आनंद घेता येईल.
विणकरांना आधुनिक तंत्रज्ञान, डिझाइन विकास, दर्जेदार कच्चा माल, पॅकेजिंग आणि थेट जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी क्लस्टर उभारले आहे. कौशल्य विकास, विमा आणि सामाजिक सुरक्षिततेच्या योजना थेट विणकरांपर्यंत पोहोचवून शासकीय योजनांच्या रूपाने बळ दिले जात आहे.