

Nashik is known as the 'Wine Capital of India'
लासलगाव ( नाशिक ) : महाराष्ट्रातील वाईन उद्योग वेगाने विस्ताराच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशभरात दरवर्षी अंदाजे ३.५ कोटी लिटर वाईन उत्पादन होते. त्यापैकी ९० टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. एकट्या नाशिक जिल्ह्यात ८० टक्के वाईन उत्पादन होते. यामुळेच नाशिकला 'भारतातील वाईन राजधानी' म्हणून लौकिक मिळाला आहे. आयएसडब्लूएआय इंडियन सोसायटी ऑफ वाईन ॲग्रीकल्चर इंडस्ट्रीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २०२६ पर्यंत महाराष्ट्रातील वाईन उद्योगाचा वार्षिक उलाढाल ५ हजार कोटी रुपयांवर पोहोचण्याची आशा वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील कृषी आधारित उद्योगांत वाईन क्षेत्र नवा टप्पा गाठणार, हे स्पष्ट होत आहे.
नाशिक जिल्ह्यात सध्या ४५ हून अधिक वायनरी कार्यरत आहेत. जिल्ह्यातील हवामान, सुपीक माती, शाश्वत पाण्याचा स्रोत आणि द्राक्ष लागवडीला पोषक वातावरणामुळे वाईन उद्योगासाठी नाशिक आदर्श ठरत आहे. याशिवाय, पर्यटन आणि वाईन टेस्टिंग संस्कृतीचा विस्तार होत आहे. नव्या उद्योजकांचा सहभाग वाढत आहे. ब्रँडेड वाईनची वाढती लोकप्रियतेमुळे बाजारपेठेचा व्याप विस्तारत आहे. वायनरीभोवती विकसित होत असलेले 'विन टूरिझम' हे नवे आकर्षण नोकरीच्या संधी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देत आहे. महाराष्ट्राचा वाईन उद्योग भविष्यातील 'राज्य समृद्धीचे इंजिन' ठरू शकतो. नाशिकचे योगदान सर्वाधिक असून नव्या गुंतवणुकीसह वायनरींचा विस्तार झाला तर महाराष्ट्र जागतिक स्तरावर स्वतःची ओळख भक्कम करू शकतो.
केंद्राने वाईन उद्योगाकडे कृषी उद्योग म्हणून पाहणे आवश्यक आहे. वाईन निर्यातीसाठी 'वन कंट्री -वन टॅक्स' लागू झाला पाहिजे. वाईनविषयी जनजागृती वाढण्यासाठी विशेष उपक्रम राबवले पाहिजेत.
प्रदीप पानपाटील, अध्यक्ष, नाशिक वायनरी असोसिएशन
वाईन वाढीचा वेग टिकवून ठेवण्यासाठी सरकारी धोरणांचा पाठबळ, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि एक्स्पोर्ट मार्केटवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना द्राक्ष प्रक्रिया उद्योगाशी अधिक जोडल्यास त्यांच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते.
सचिन होळकर, कृषीतज्ज्ञ, लासलगाव
वाईन उद्योग विस्तारासाठी आवश्यक पावले
गुणवत्ताविहित द्राक्ष लागवड व तंत्रज्ञान उत्पादन वाढीसोबत गुणवत्तेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारांसाठी भारतीय वाईन ब्रँडची ओळख वाढवावी. वायनरीमध्ये पर्यटन सुविधा, चाखण्याची व्यवस्था वाढवून स्थानिक उत्पन्न वाढवता येईल. द्राक्ष उत्पादक, वाइनरी आणि शासन यांच्यात समन्वय वाढवणे गरजेचे. सवलती, वित्तीय मदत किंवा उद्योग-उत्साह वाढविणारे धोरणात्मक साहाय्य आवश्यक आहे.
वाईन उद्योगापुढील आव्हाने
उत्पादनाची वाढ होत असली तरी भारतातील वाईनचा प्रति व्यक्ती खप फार कमी आहे. निर्यातीत स्पर्धा कमी पडत आहे. उत्पादन खर्च जास्त आहे. त्यामुळे युरोपियन बाजारात स्पर्धात्मक स्थिती कठीण आहे. हवामान बदल, अवकाळी हे द्राक्ष लागवडीसाठी धोका ठरत आहेत.