

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अवकाळी पावसाने गुरुवारी (दि.२) नाशिक शहराला अक्षरशः झोडपून काढले. सायंकाळी ६ च्या सुमारास आलेल्या पावसाने तासभर हजेरी लावत, दाणादाण उडवून दिली. नेहमीप्रमाणे उड्डाणपुलावर पाणी साचले. तर शहरभर रस्ते खोदून ठेवल्याने, बहुतांश रस्ते चिखलमय झाले. या रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली.
सुमारे तासाभरात ३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून नाशिकवर अवकाळी पावसाचे ढग दाटून येत होते. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यातील विविध भागांत अवकाळी पावसासह गारपिटीने तांडव केल्याने, शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गुरुवारी शहरासह जिल्ह्यात अवकाळीने हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. सकाळपासूनच ढग दाटून आले होते. शहरात हनुमान जयंतीचा उत्साह असताना, सायंकाळी ६ च्या सुमारास अवकाळी पावसाने बरसण्यास सुरुवात केली. अवघ्या काही मिनिटांतच पावसाच्या जोरदार धारा बरसल्याने, नाशिककरांची चांगलीच धावपळ झाली, हनुमान जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातही पावसाने मोठा व्यत्यय निर्माण केला.
शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते. तर खोदकाम केलेले रस्ते चिखलमय झाले होते. सिडको आणि सातपूरमधील भागात रस्त्यांवर पाणी साचले होते. पंचवटीतदेखील पावसामुळे तारांबळ उडाली होती.
द्वारकेसह शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची मोठी कोंडीदेखील झाली होती. हवामान विभागाने जिल्ह्याला आणखी दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. ४ एप्रिलपर्यंत उत्तर महाराष्ट्रासह अन्य भागात अवकाळीचा पाऊस सक्रिय राहणार असल्याने, बहुतांश जिल्ह्यांना यापूर्वीच 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
सराफ बाजारात पाणी
पावसाळ्यात रिमझिम पाऊस झाला, तरी सराफ बाजारात गुडघाभर पाणी साचते. महापालिकेने या भागातील नालेसफाईचा कितीही दावा केला असला तरी, प्रत्येकवेळी महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे. अवकाळी पावसानेदेखील महापालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल ठरविला. अवघ्या काही मिनिटांतच अवकाळी पावसाने सराफ बाजारात गुडघाभर पाणी साचले होते. मेनरोड, सरस्वती लाइन, दहीपूल, सराफ बाजार या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
पावसामुळे बत्ती गूल
पावसाचा शिडकावा झाला तरी, बत्ती गुल होत असल्याचा नाशिककरांचा अनुभव आहे. त्याचा प्रत्यय अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा नाशिककरांना आला. धो-धो बरसलेल्या पावसामुळे शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. महावितरण कर्मचाऱ्यांशी संपर्क साधत, विजेबाबत तक्रारी केल्या.
वाहतुकीची कोंडी
चाकरमान्यांची घरी जाण्याची वेळ अन् अवकाळीच्या बरसण्याची वेळ एकच झाल्याने, शहरातील जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. द्वारका, मुंबई नाका, इंदिरानगर बोगदा, गोविंदनगर, सिटी सेंटर मॉल सिग्नल, गंगापूर रोड, कॉलेजरोड, रविवार कारंजा, बिटको सिग्नल आदी भागांत वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू होते.