

ठळक मुद्दे
शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या मनोमिलन बैठकीतच उबाठात वादाचा अंक
उबाठाचे राज्य संघटक विनायक पांडे आणि ज्येष्ठ पदाधिकारी जयंत दिंडे यांच्यात शाब्दीक चकमक
दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांनी आवाज वाढविल्याने तणावात अधिकच भर
नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीला घेरण्यासाठी संयुक्त आंदोलने, मोर्चे काढण्याच्या नियोजनाकरीता आयोजित शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या मनोमिलन बैठकीतच उबाठात वादाचा अंक घडला. विधानसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यानच्या मुद्यावरून उबाठाचे राज्य संघटक विनायक पांडे आणि ज्येष्ठ पदाधिकारी जयंत दिंडे यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक घडली. यानंतर पांडे बैठक सोडून कार्यालयाबाहेर पडल्याने उबाठालाच मनोमिलनाची आवश्यकता असल्याची चर्चा शहरभर रंगली.
महापालिका व जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना(उबाठा) व मनसे युतीच्या प्रक्रियेने जोर धरला आहे. राज्यातील महायुती सरकारचे जनहितविरोधी निर्णय आणि धोरणांविरोधात संयुक्त आंदोलन छेडण्यासंदर्भात शालिमार येथील शिवसेने (उबाठा)च्या मध्यवर्ती कार्यालयात उबाठा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरात दररोज खुनसत्र तसेच इतरही प्रकारची गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढल्याकडे माजी आमदार वसंत गिते यांनी लक्ष वेधले.
नाशिक शहरात 'हनी ट्रॅप'चे प्रकरण घडले. त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याची भूमिका गिते यांनी मांडली. एमडी ड्रग्ज प्रकरणातही नाशिकचे नाव बदनाम झाले, त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करत शहरातील रस्ते, खड्डे, पाणीप्रश्न सोडविण्यासाठी एकत्र येण्याची गरज गिते यांनी व्यक्त केली. यानंतर संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी एमडी ड्रग्ज यासारखे मुद्दे निवडणुकीत उपस्थित झाले नसते तर विधानसभा निवडणुकीत पराभव झाला नसता, असे सांगितले. मात्र त्यास विनायक पांडे यांनी तीव्र आक्षेप घेत मध्य विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराला तुम्ही होते का आणि ८८ हजार मते उगाचच पडली का? असा प्रतिप्रश्न केला. यावरून पांडे आणि दिंडे यांच्यामध्ये व्यासपीठावरच शाब्दीक चकमक उडाल्याने बैठकीत तणाव निर्माण झाला. दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांनी देखील आवाज वाढविल्याने तणावात अधिकच भर पडली. अखेर पांडे बैठकीतून बाहेर पडल्याने तणाव निवळला.
मेळाव्यास व्यासपीठावर जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलिम शेख, जिल्हाप्रमुख अंकुश पवार, शहर प्रमुख सुदाम कोंबडे, प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे, शिवसेना लोकसभा समन्वयक निवृती जाधव, महानगरप्रमुख प्रथमेश गिते तसेच केशव पोरजे, भारती ताजनपूरे, जगन आगळे, महेश बडवे, भैय्या मणियार, संजय चव्हाण, मसूद जिलानी, विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, राहूल दराडे, देवा जाधव, सूत्रसंचालन शिवसेना उबाठा महानगर संघटक सचिन बांडे यांनी केले.
शहरात गुन्हेगारीसह खड्डे, पाणीपुरवठा यासारखे महत्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. मनपाकडूनही कोणतीच कामे केली जात नसल्याने नागरिकांच्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे आगामी काळात दोन्ही पक्षांना एकत्र येऊन आंदोलन करण्याची गरज असल्याचे उबाठाचे उपनेते दत्ता गायकवाड यांनी सांगितले. आगामी निवडणुका महत्वाच्या असून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोेचले पाहिजे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. शहरात गुन्हेगारी वाढत आहे. गुन्हेगारी कमी करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था चांगली रहावी म्हणून मोर्चातून सरकारला जाब विचारला जाईल असे मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी सांगितले.