

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा, प्रधान सचिव, आदिवासी आयुक्त हटाव या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थी जेन झी मुंबईला धडकणार हे निश्चित झाले असून, नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च (पायी मोर्चा) असणार आहे.
दि. १६ ते २० म्हणजे गणेशोत्सव काळात हा मोर्चा मुंबईला जाणार आहे. मोर्चाची राज्यभर व्याप्ती वाढवण्यासाठी आंदोलक जिल्हानिहाय बैठका घेऊन गावागावांत, वसतिगृह, आश्रमशाळांवर जाऊन जनजागृती करणार आहे.
मोर्चासाठी 'आश्वासन नको - ठोस अंमलबजावणी हवी !' हे घोषवाक्य निश्चित केले आहे.
सकल आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समितीची महत्त्वाची बैठक नाशिक येथे झाली. बैठकीस विद्यार्थी, विद्यार्थी प्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली.
आंदोलनाची धग कायम रहावी यासाठी लवकरात लवकर मोर्चा काढण्यात यावा, अशी मागणी झाली. त्यावर १६ ते २० सप्टेंबर याच कालावधीतील तारीख निश्चित केली जाईल, ही तारीख राज्यभरातील समन्वयकांच्या बैठक घेऊन अंतिम केली जाणार आहे.
नाशिक येथून हा मोर्चा मुंबईला निघेल. त्यासाठीचे नियोजन महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रतिनिधी व विविध विद्यार्थी संघटनांसोबत समन्वय साधून करण्याबाबत चर्चा झाली. आंदोलनाची व्याप्ती महाराष्ट्रात वाढवण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्रित बैठक घेऊन पुढील आंदोलनाचे नियोजन करण्याचा निर्णय यावेळी झाला.
आदिवासी विकासमंत्री यांनी राजीनामा द्यावा.
आदिवासी विकास विभागाचे आयुक्त, सचिव हटाव.
गडचिरोली जपतपाई आश्रमशाळेतील सर्पदंश घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
सेंट्रल किचन व्यवस्था बंद करून विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जादार भोजन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
आदिवासी आयोग महाराष्ट्र स्थापन करावा.
प्रवेशासाठी डोनेशन बंद करून मोफत शिक्षण द्यावे.
आदिवासी शिक्षणातील होणारे खासगीकरण तत्काळ थांबवावे.