

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या नाशिक बाजार समितीच्या भाजीबाजारात मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे. शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांची गैरसोय होत आहे. बाहेरील जिल्ह्यांतून रात्री-अपरात्री शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी आणि विश्रांतीची सुविधा मिळत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
भाजीबाजारात ८० आडत दुकाने आहेत. मात्र, बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत उपलब्ध सुविधा अपुऱ्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी काही ठिकाणी व्यवस्था असली, तरी त्या ठिकाणी पाणी नसल्याच्या तक्रारी आहेत.
स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याचाही प्रश्न आहे. रात्री मुक्काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुरक्षित विश्रांतीची व्यवस्था नसल्याने त्यांना उघड्यावर थांबावे लागते. बाजार आवारात दररोज मोठ्या प्रमाणात खराब भाजीपाला व कचरा जमा होतो. वेळेवर विल्हेवाट न लागल्याने दुर्गंधी पसरते.
पावसात चिखल व खड्डे असल्याने पाण्याची डबकी निर्माण होतात. यामुळे मालाची आवक-जावक आणि विक्री करताना अडचणी येतात. पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्याने सकाळच्या वेळेत वाहतूक कोंडीही होते.
शेतमालाच्या सुरक्षेचाही प्रश्न गंभीर आहे. बाजार समितीने पोलिस चौकीसाठी सुविधा उभारल्या असल्या तरी येथे नियमित पोलिसांची उपस्थिती नसते. त्यामुळे चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी होत आहे.
बाजार आवारातील डांबरीकरण, स्वच्छता आणि ड्रेनेज दुरुस्तीची कामे प्रस्तावित असून, निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, वारंवार आश्वासने मिळूनही कामाला गती मिळत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.
बाजार शुल्काच्या माध्यमातून उत्पन्न मिळत असताना शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा का मिळत नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाने केवळ आश्वासन न देता तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.