नाशिकच्या 'या' मंदिरात महादेवासमोर नंदी नाही, काय आहे आख्यायिका?

Shree Kapaleshwar Mahadev Mandir Nashik | Mahashivratri Special Story
Shree Kapaleshwar Mahadev Mandir Nashik
या मंदिरात शिवाचे आवडते वाहन नंदी त्याच्यासोबत नाही. लोक या मंदिराला कपालेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखतात.File Photo
Published on
Updated on

गणेश सोनवणे, नाशिक

नाशिक ही धार्मिक नगरी म्हणून ओळखली जाते. जिल्ह्यातील प्रत्येक गावात शिवमंदिर आपल्याला पाहायला मिळते. पण नाशिक शहरात एक असे शिवमंदिर आहे, ज्याचे एक वेगळेपण आहे. नंदी हे महादेवाचे वाहन असल्याने महादेवांच्या प्रत्येक मंदिरात नंदीला महादेवांच्या पिंडीसमोरचं स्थान असतं. मात्र, या मंदिरात शिवाचे आवडते वाहन नंदी त्याच्यासोबत नाही. लोक या मंदिराला कपालेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखतात.

नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या किनाऱ्याजवळ कपालेश्वर महादेव मंदिर आहे. नंदी नसलेल्या एकमेव शिवालय असलेल्या श्री कपालेश्वर महादेवाचे लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. पुराणात असे म्हटले आहे की, भगवान शिव शंकर येथे काही काळ वास्तव्यास होते. जगभरात असलेल्या प्रत्येक शिवमंदिरात नंदी हा शिवपिंडीसमोर असतोच. नंदी हा जरी महादेवाचे वाहन समजला जात असला तरी नाशिकच्या या मंदिरात महादेवाच्या पिडींसमोर नंदीच नाही, कारण याठिकाणी महादेवाने नंदीला आपले गुरु मानले आहे. मग, नेमकं असं काय झालं की या ठिकाणी महादेवाने नंदीला आपलं गुरु मानलं आहे. याचीच माहिती आज आपण घेणार आहोत.

अशी आहे या मागची आख्यायिका…

एकदा इंद्र सभा भरली होती. त्या सभेला सर्व देव उपस्थित होते. त्यावेळी ब्रम्हदेव व शिवशंकर यांच्यात वाद झाला. त्यावेळी पाच तोंडे असलेल्या ब्रम्हदेवाची चार तोंडे वेध म्हणत तर एक तोंड निंदा करत असे. संतापलेल्या महादेवांनी ब्रम्हदेवाचे पाचवे तोंड (निंदणारे) तोंड उडविले. ते तोंड शिवशंकर यांच्या हाताला चिटकून बसले. त्यामुळे शिवशंकरास ब्रम्हहत्येचे पातक लागले. त्यावेळी महादेवांनी या पातकापासुन स्वताची मुक्ती करुन घेण्यासाठी त्रिभुवन पालथं घातलं. मात्र, त्यांचं पातक काही दूर होईना… या पातकापासून आपली कशी सुटका करुन घ्यावी याची चिंता महादेवांना सतावत होती.

ब्रम्हहत्येच्या दोषापासून मुक्ती कशी मिळवायची या चिंतेत असलेल्या महादेवांची हीच समस्या अखेर नंदीने सोडविली. अशातच नंदीनं महादेवांना नाशिकच्या रामकुंडावर आणले. याठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवांचं ब्रम्हहत्येचं पातक दूर झालं आणि ते ब्रम्हहत्येच्या दोषातुन मुक्त झाले. आपल्याला या पातकापासून नंदीनं मुक्ती दिली, यामुळेच या ठिकाणी महादेवांनी नंदीला आपला गुरु मानलंय. अशी आख्यायिका आहे.

मग नंदी गेला कुठे ?

कपालेश्वर मंदिराच्या समोरच काही अंतरावर गोदावरी नदी वाहते. या नदीतच म्हणजेच रामकुंडात हा नंदी विसावलेला आहे. यावेळी शंकराने नंदीला सांगितल्यानुसार बारा ज्योतिर्लिंगानंतर नाशिकमधील कपालेश्वर मंदिराचे महत्व आहे. महादेवाचं हे असं मंदिर आहे, जिथे नंदीच नाही. एका कपालेश्वर मंदिराच्या दर्शनात बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य मिळत असल्याचा पौराणिक संदर्भही सापडतो.

महाशिवरात्रीला 24 तास मंदिर दर्शनासाठी खुले

आजच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. सकाळपासून भाविक दर्शनासाठी रांगा लावतात. महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक केला जातो. पूजाविधी केले जातात. यावेळी महाशिवरात्रीला भाविकांना केवळ 15 मिनिटांत दर्शन होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेता महिला व पुरुषांच्या स्वतंत्र्य दर्शन रांगा असणार आहे. महाशिवरात्र असल्याने 24 तास मंदिर दर्शनासाठी खुले असणार आहे. याशिवाय कपालेश्वर मंदिरात दर सोमवारी व श्रावणी सोमवारी भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news