

नाशिक : डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी एक जिज्ञासा जागृत करणारी परीक्षा आहे. कारण यात विद्यार्थ्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो दहावी पर्यंतचाच असून अत्यंत बारकाईने या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारलेले असतात. यातून विद्यार्थ्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती वृद्धिंगत होण्यास मदत होते, असे प्रतिपादन कै. बी. पी. पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश अनारसे यांनी केले.
दैनिक पुढारी वृत्तपत्र समूह आणि निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कै. बी. पी. पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा २०२५ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
परीक्षा कालावधी हा दोन तासांचा असून सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेमध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले. लकी ड्रॉमध्ये विद्यार्थ्यांना प्रामुख्याने स्मार्टवॉच, टिफिन सेट आणि स्कूल बॅग यांचे वाटप करण्यात आले. तसेच तालुकास्तरावर प्रथम पाच विद्यार्थ्यांसाठी भरघोस शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहेत.
डिसेंबरमध्ये या परीक्षांचे आयोजन करण्यात आले असून मागील वर्षापासून ही परीक्षा अधिक व्यापक स्वरूपात व दोन टप्प्यांत घेण्यात येत आहेत. प्रथम टप्पा म्हणजे ही परीक्षा तालुकास्तरावर वेगवेगळ्या २३ केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम टप्प्यात रविवार, दि. ७ डिसेंबर रोजी येवला, कळवण, देवळा, सटाणा , वणी आणि निफाड या केंद्रांचा समावेश करण्यात आलेला होता. ही परीक्षा इयत्ता दहावीच्या गटासाठी आयोजित करण्यात आली होती. या सहाही केंद्रांपैकी निफाड केंद्रावर १४०० विद्यार्थी, सटाणा केंद्रावरती ७५२, येवला ६९०, वणी ३९०, देवळा ४७० आणि कळवण केंद्रावर ३२५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
करिअर संधींबाबत मार्गदर्शन
विद्यार्थ्यांना पुढील करिअर संधीं बाबत योग्य असे मार्गदर्शन दिनेश अनारसे यांनी केले. तसेच आपल्या मनोगतामधून त्यांनी स्पर्धा परीक्षेचे, वेळेचे महत्त्व, डॉ. ए.पी. जे अब्दुल कलाम यांचे जीवन चरित्र, विचार आणि आजच्या पिढीतील विद्यार्थी आणि त्यांची भूमिका याचे महत्वदेखील पटवून दिले.