बोरगाव : पुढारी वृत्तसेवा
कोट्यवधी निधी खर्चून रस्ता बांधायचा आणि सात महिन्यांतच तो उखडून खड्ड्यात घालायचा, याला विकास म्हणायचा तरी कसा? असा संतप्त प्रश्न दांडीची बारी (ठणकाची बारी) ते जाहुले या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याच्या दुरवस्थेने नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पेठ आणि सुरगाणा तालुक्यांना जोडणारा सुमारे आठ ते नऊ किलोमीटरचा हा महत्त्वाचा रस्ता अवघ्या सात महिन्यांतच उखडून गेला आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी मोठेमोठे खड्डे पडले असून, पावसाचे पाणी साचल्यामुळे काही खड्ड्यांना चक्क तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे या मार्गावर जड वाहनांची वाहतूकही नसताना रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे.
त्यामुळे कामाच्या दर्जावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रस्ता बांधला की, निधीचा बंदोबस्त केला, अशी चर्चा परिसरात आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचा धोका वाढला असून, विद्यार्थी, रुग्ण, गर्भवती तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असाही प्रश्न नागरिक करीत आहेत. रस्ता निकृष्ट असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असताना, संबंधित ठेकेदारावर कारवाई का होत नाही? कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित का केली जात नाही? ठेकेदार आणि संबंधित यंत्रणेच्या संगनमतामुळेच जनतेच्या पैशाची अशी उधळपट्टी होत आहे का? याबाबत चौकशीची मागणी जोर धरत आहे.
दि. १६ व १७ सप्टेंबर रोजी आदिवासी विकासमंत्री सुरगाणा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात केवळ शासकीय योजनांची पाहणी आणि बैठका न घेता, त्यांनी दांडीची बारी - जाहुले या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या रस्त्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे आणि त्याच्याकडूनच रस्त्याची दर्जेदार फेरदुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणी केली आहे. तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा उपसरपंच जयराम भोये (मनखेड) यांच्यासह नागरिकांनी दिला आहे.