

कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्याच्या हद्दीतील बोरगाव टोलनाक्याजवळ होणारी गोवंशांची बेकायदेशीर वाहतूक कवठेमहांकाळ पोलिसांनी पकडली. शुक्रवारी (दि. 10) पहाटे पोलिसांनी कारवाई करत 13 जनावरांची सुटका केली. या कारवाईत वाहन जप्त करण्यात आले असून, चालकासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई हवालदार महेश माने यांनी 9 एप्रिलच्या रात्रीपासून 10 एप्रिलच्या पहाटेपर्यंत गस्तीवर असताना केली.
मुंबईतील मानद प्राणी कल्याण अधिकारी आशिष बारीक यांनी 112 हेल्पलाईनवर बोरगाव टोलनाक्याजवळ संशयास्पद वाहन अडवल्याची माहिती दिली. यानंतर गस्ती पथक पहाटे पावणेपाच वाजता घटनास्थळी पोहोचले. तिथे संशयित वाहन (एमएच 10 डीटी 7085) तपासले असता, त्यामध्ये गोवंश जातीची 13 जनावरे अत्यंत क्रूरतेने कोंबून ठेवलेली आढळली. जनावरांना पुरेशी जागा नव्हती, काहींचे पाय बांधून त्यांना खाली पाडण्यात आले होते. तसेच चारा आणि पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती.
याप्रकरणी वाहनचालक खाजुद्दीन फक्रुद्दीन शेख (वय 36) आणि साथीदार रमजान इसरार मनीयार (वय 24, दोघेही रा. शास्त्री चौक, पिरजादे प्लॉट, मिरज) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे वाहतुकीसाठी आवश्यक कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी जनावरे आणि वाहन ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी अहवाल सादर केला आहे. या बेकायदेशीर वाहतुकीमागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.
तो टेम्पो तिसऱ्यांदा सापडला
बोरगाव टोलनाक्याजवळ जप्त केलेले वाहन यापूर्वीही दोन वेळा अशाच गुन्ह्यांत सापडले आहे. तासगाव आणि विटा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत याच वाहनावर बेकायदेशीर गोवंश वाहतुकीसाठी कारवाई झाली होती. पुन्हा त्याच वाहनाचा वापर गुन्ह्यासाठी होणे ही बाब चिंताजनक मानली जात आहे.