

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
ठाणगाव परिसरातील शेतकऱ्यांनी अहोरात्र कष्ट करून पिकविलेला कांदा खरेदी करून दोघांनी ५४ शेतकऱ्यांची तब्बल ६८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेतकरी आबाजी काकड (४५, रा. ठाणगाव, ता. सिन्नर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. तक्रारीनुसार बाळकृष्ण काकड (रा. मुंबई) यांनी आबाजी काकड व गावातील शेतकऱ्यांची ओळख आरोपी योगेश कटारे (ओम साई ट्रेडर्स, घाटकोपर) यांच्याशी करून दिली.
कटारे हा खात्रीशीर कांदा व्यापारी असून, १५ दिवसांत पैसे देईल, असे सांगण्यात आले होते. २१ नोव्हेंबर २०२५ ला बाळकृष्ण काकड आणि कटारे या दोघांनी आबाजी काकड यांच्या चाळीतील अंदाजे सहा लाख ५३ हजार रुपयांचा सुमारे ७०० गोणी कांदा नेला होता.
त्यापैकी चार लाख रुपये देण्यात आले; मात्र उर्वरित दोन लाख ५३ हजार रुपये दिले नाहीत. ५४ अशाच पद्धतीने ठाणगाव परिसरात जवळपास शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करीत सुमारे ६८ लाख ३३ हजार ४०० रुपयांची रक्कम आरोपींनी अदा केली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
काही शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आले होते, तर काहींना देण्याचे आश्वासन देण्यात आले. दिलेले काही धनादेश बँकेत सादर करू नयेत, असे सांगत दोघांनी वेळकाढूपणा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.