

चेन्नई शहरातील प्रसिद्ध गोल्डन बीच येथे फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील आयटी विद्यार्थ्यांच्या गटावर भीषण संकट कोसळले आहे. एकूण २६ आयटी विद्यार्थ्यांचा हा गट चेन्नईत पर्यटनासाठी गेला असताना समुद्रात उतरल्यामुळे ही गंभीर दुर्घटना घडली. या दुर्दैवी घटनेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून एक विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला असून ते मदत व बचाव कार्यावर सतत देखरेख ठेवून आहेत.
तामिळनाडू शासनाकडून प्राप्त माहितीनुसार, २६ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३ विद्यार्थी पाण्यात उतरले होते. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील मयुरी चौधरी यांना दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागला, तर जय पाटील यांचा शोध अद्याप लागलेला नाही.
मयुरी अलीकडेच अवघ्या १५ दिवसांपूर्वी नोकरीवर रुजू झाली होती. आज मित्रमंडळीसोबत फिरण्यासाठी गेल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे. दरम्यान, राज केदारी हे सुरक्षितपणे बाहेर आले आहेत.
जय पाटील यांचे नातेवाईक चेन्नई येथे पोहोचले असून, मयुरी चौधरी यांचे नातेवाईक नागपूरहून चेन्नईकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुःखद घटनेबद्दल मयुरी चौधरी यांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोक व्यक्त करत संवेदना व्यक्त केल्या आहेत.
तामिळनाडू सरकारने शोध व बचाव कार्य अधिक गतीने राबवून सर्वतोपरी मदत करावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य प्रशासन संबंधित कुटुंबीयांच्या सतत संपर्कात असून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जात आहे.