

त्र्यंबकेश्वर : येथील सिंहस्थ विकासकामे कासवगतीने सुरू आहेत. खोदून ठेवलेले रस्ते 'जैसे थे' असून, रखडलेल्या विकास कामांचा फटका रहिवाशांसह भाविकांना बसत आहे. रांगेत उभे राहण्यासाठी जागा नाही, मंदिराच्या प्रवेशद्वारी पोहोचण्यास रस्ता नाही. पहिल्याच पावसाने उडालेली दाणादाण पाहता यापुढे आणखी किती समस्यांना तोंड द्यावे लागणार, असा सवाल नागरिक विचारत आहेत. सिंहस्थ विकासकामांच्या नावाने झालेला गाजावाजा पाहता ध्वजारोहणास अवघे चार महिने शिल्लक असताना केवळ कागदी घोडे नाचवण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
आखाड्यांना विकासकामांसाठी पहिल्या टप्प्यात एक कोटी, दुसऱ्या टप्प्यात आणखी एक कोटी देण्यात आले, किरकोळ अपवाद वगळता ही कामे सुरूच झालेली नाही. त्यात विकासकामांसाठी आणखी तीन कोटी रुपये देण्याची प्रक्रिया सुरू आहे. बहुतांश आखाड्यांनी विकासकामे नको, आम्हाला त्या बदल्यात निवासी खोल्या बांधून द्या, असे सांगितले आहे. त्यामुळे आखाड्यात फेरफटका मारला असता वैयक्तिक खर्चातून सुरू असलेल्या कामांव्यतिरिक्त शासनाने दिलेल्या कामांचा मागमूस दिसत नाही.
त्र्यंबकेश्वर शहरात ३९ कोटींच्या भुयारी गटार योजनेचे ४ वर्षांपासून सुरू असलेले काम पूर्ण झालेले नाही. प्रशासनाने नव्याने २८ कोटींची वाढीव गटार योजना मंजूर केली; मात्र ते काम देखील कागदावरच आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही. नदी-नाल्यांत सोडलेले सांडपाणी आजही वाहते आहे, अशा परिस्थितीत गौतमी बेझे धरणाचे पाणी आणून ते तलाव आणि नदी-नाल्यांत सोडण्यासाठी उपसा योजना सुरू आहे. शहरातील सर्व सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहे पाडण्यात आल्याने भाविकांची गैरसोय होत आहे.
राज्य पुरातत्त्व विभागाने तलावांचे सुशोभीकरण, संवर्धनासाठी ५५ कोटींचा निधी खर्च करत कामाला प्रारंभ केला. मात्र प्राचीन सुस्थितीत असलेल्या तलावांच्या भिंती तोडून त्या जागी नव्याने दगड बसवण्याचे काम सुरू आहे. यात प्राचीन अमूल्य ठेवा नामशेष होत आहे. दर्शनपथासाठी केवळ तोडफोड करण्यात वेळ घालवला. भाजीबाजाराचे बांधकाम अद्यापही अपूर्णावस्थेत आहे.