

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेकडून सुरू असलेल्या सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या रस्ते व पायाभूत सुविधा कामांच्या दर्जावरून सुरू असलेल्या टीकेला महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. "सिंहस्थाच्या कामांच्या निविदा प्रक्रियेत किंवा गुणवत्तेत कुठेही तडजोड केलेली नाही.
विरोधकांनी पुराव्यासह एक तरी चूक दाखवून द्यावी. कुंभाच्या कामात एक जरी चूक काढून दाखवली, तर मी माझे नाव बदलेन," असे थेट आव्हान आयुक्त खत्री यांनी टीकाकारांना दिले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुमारे १,२३० कोटी रुपये खर्चून २९ रस्त्यांची कामे सुरू आहेत.
त्याचबरोबर रस्ते, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण यांसह विविध पायाभूत सुविधांची जवळपास पाच हजार कोटी रुपयांची कामे महापालिकेकडून हाती घेण्यात आली आहेत. मात्र, या कामांच्या दर्जावरून सोशल मीडिया तसेच राजकीय वर्तुळातून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निविदा प्रक्रियेवरही आक्षेप घेत महापालिका प्रशासनाला लक्ष्य केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना आयुक्त खत्री यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. "महापालिका आयुक्त म्हणून माझे सर्वांना खुले आव्हान आहे. महापालिकेची निविदा कागदपत्रे संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध आहेत.
कामांमध्ये पूर्ण पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. ज्यांना कामांची तपासणी करायची आहे, त्यांनी जरूर तपासणी करावी. आम्ही कुठे चुकलो आहोत, हे पुराव्यासह दाखवून द्यावे," असे त्यांनी स्पष्ट केले.
सिंहस्थाच्या कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली नसल्याचा पुनरुच्चार आयुक्तांनी केला. "सिंहस्थाच्या कामांमध्ये कुठेही तडजोड झालेली नाही आणि होणारही नाही. प्रत्येक कामावर महापालिका प्रशासन कठोरपणे लक्ष ठेवून आहे.
सोशल मीडियावर विकासकामांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. त्यामुळे माझे सर्वांना पुन्हा एकदा ओपन चॅलेंज आहे. कुंभाच्या कामात एक जरी चूक काढून दाखवा, मी माझे नाव बदलेन," असे खत्री यांनी ठामपणे सांगितले. कुंभमेळ्यासाठी सुरू असलेली सर्व कामे दर्जेदार तसेच निर्धारित वेळेत पूर्ण केली जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रस्त्यांच्या कामांच्या गुणवत्तेसाठी महापालिकेने विशेष निकष निश्चित केले आहेत. एम-४० आणि एम-६० पर्यंतची सिमेंट स्ट्रेंथ देण्यात आली असल्याचे आयुक्तांनी सांगितले. या रस्त्यांच्या कामांची आणि गुणवत्तेची आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञ पथकाने पाहणी केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञ पथकाने रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. एवढ्या चांगल्या दर्जाची कामे आम्ही यापूर्वी कुठे पाहिली नाहीत, असे या पथकाने आम्हाला सांगितले. ही बाब आमच्यासाठी निश्चितच अभिमानाची आहे, असे आयुक्त खत्री यांनी नमूद केले.