निफाड(जि. नाशिक) : मालोजीराव मोगल यांच्यामध्ये संकटाचा धैर्याने सामना करण्याची वृत्ती होती. ज्यावेळेस तब्बल 35 आमदार आपल्याला सोडून गेले, त्या काळात मालोजीराव हे आपल्यासोबत राहिले. संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि जिल्ह्यातील सर्व आमदारकीच्या जागा आमच्याकडे आल्या यात सर्वात मोठा वाटा हा मालोजीराव यांचाच होता, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
निफाड तालुक्यातील चांदोरी येथे स्व. मालोजीराव मोगल यांच्या जयंती व स्मृतिदिनाचे औचित्य साधून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यावेळी ते बोलत होते. पवारांनी मालोजीरावांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. पवार म्हणाले, मालोजीरावांनी जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद, निफाड सहकारी साखर कारखाना, मराठा विद्या प्रसारक समाज अशा जिल्ह्यातील विविध संस्थांचे नेतृत्व केले. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे, शेती व जिल्ह्याच्या विकासासाठी सतत विचार करणारे ते नेते होते. त्यांचे राहिलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी आता त्यांच्या चिरंजीवांवर आहे आणि आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे, माजी आमदार अनिल कदम, कल्याणराव पाटील, नानासाहेब बोरस्ते, योगेश घोलप, संजय चव्हाण, दीपिका चव्हाण, श्रीराम शेटे, गजानन शेलार, दत्तात्रय पाटील, राजेंद्र मोगल, दिलीपराव मोरे, जयदत्त होळकर, माणिकराव बोरस्ते, शांताराम बनकर, पंढरीनाथ थोरे, डॉ. अमृता पवार, बाळासाहेब क्षीरसागर, ॲड. भगीरथ शिंदे, आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कै. मालोजीराव मोगल यांच्या स्मृती कार्यक्रमासाठी शरद पवार आले होते. निफाड तालुक्याच्या वतीने मी त्यांचा सत्कार केला. येवला मतदारसंघासाठी मी भारतीय जनता पक्षाची पदाधिकारी म्हणून काम करत आहे. जर मला शरद पवार गटाकडून येवला मतदारसंघातून लढण्यासाठी संधी मिळाल्यास मी नक्कीच विचार करेल.
- अमृता पवार, भाजपा नेत्या