

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
निफाड तालुक्यात गुरुवारी (दि. २) दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काढणीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना मोठा फटका बसला. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
तालुक्यातील रुई, धानोरे, खेडलेझुंगे, कोळगाव, कानदळ, देवगाव, शिरवाडे, वाकद, नांदगाव तसेच परिसरातील अनेक गावांत गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यात द्राक्ष, कांदा, गहू, मका, डाळिंबावर गारांचा मारा झाल्यामुळे उत्पादन घटण्याची भीती आहे.
द्राक्ष घडांना तडे गेले असून, कांदा आणि गहू भिजल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करीत योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी रुई येथील शेतकरी ज्ञानेश्वर तासकर यांनी केली आहे.
कुणाल दराडे यांनी केली पाहणी
नुकसानीची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे नेते कुणाल दराडे यांनी शेतपिकांची पाहणी केली. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याशी संपर्क साधत पंचनामे करण्याची विनंती केली.
याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बाजार समितीचे माजी संचालक विजय सदाफळ यांच्यासह खेडलेझुंगे येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एक एकर डाळिंबबाग लावली आहे. गुरुवारी झालेल्या गारपिटीमुळे डाळिंबाचे फळ खाली पडले. फुलांचीही गळती झाल्यामुळे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, तरच शेतकरी टिकेल.
-कैलास सदाफळ, डाळिंब उत्पादक, खेडलेझुंगे
दोन एकर द्राक्ष पीक जोमदार आले होते. १३० रुपये किलोप्रमाणे व्यवहार झाला होता. सोमवारपासून द्राक्ष काढणी हंगाम सुरू होणार होता. मात्र, गारपिटीमुळे संपूर्ण द्राक्षबाग उद्ध्वस्त झाली. शासनाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी.
- नामदेव घोटेकर, शेतकरी, खेडलेझुंगे