

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकाची दुसरी यादी शुक्रवारी अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १,४४२ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ६५७ शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जदार असून ७८५ शेतकरी राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्जदार आहेत.
कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांकडे 'ॲग्रीस्टॅक नोंदणी' (फार्मर आयडी) क्रमांक असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांची अद्याप नोंदणी झालेली नाही, त्यांनी तत्काळ नजीकच्या 'आपले सरकार सेवा केंद्रा'वर जाऊन ही नोंदणी करून घेणे बंधनकारक आहे.
या कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी यादीतील सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी लाभार्थ्यांनी नजीकच्या 'आपले सरकार सेवा केंद्र' किंवा 'महा ई-सेवा केंद्र' येथे उपस्थित राहून बायोमेट्रीक किंवा आवश्यक पद्धतीद्वारे आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, अशी सूचना करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र आणि महा ई-सेवा केंद्रांच्या चालकांसाठी या प्रक्रियेबाबतचे ऑनलाईन प्रशिक्षण जिल्हा प्रकल्प कार्यालयामार्फत पूर्ण करण्यात आले आहे. या संबंधीची सविस्तर कार्यपद्धती जिल्ह्यातील सर्व सेवा केंद्रांवर आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे कळवण्यात आले आहे.
"पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जिल्ह्यातील सर्व संबंधित ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे कार्यालय व सचिव, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, तसेच सर्व राष्ट्रीयीकृत बँका आणि ग्रामीण बँकांच्या शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत नाव आलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करून घ्यावे."
- राम कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक, रत्नागिरी.