

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशाच्या राजकारणात 'थ्री इडियट्स' आहेत. त्यापैकी एक महाराष्ट्रात, तर दोन केंद्रात आहेत, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 'इडियट' हा काही असंसदीय शब्द नाही. ज्यांना वंदे मातरम्चा इतिहास माहीत नाही, त्यांना आरसा दाखविण्याची गरज आहे, असे सांगत राऊत यांनी केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधात शिवसेनेच्या (उबाठा) वतीने राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महापालिकेवर सोमवारी (दि. १७) जनाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या प्रारंभी माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी विविध राजकीय मुद्द्यांवरून भाजपला लक्ष्य केले. केंद्रीय मंत्रिमंडळातील नेत्यांना 'इडियट' म्हटल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता राऊत म्हणाले, इडियटला इडियट म्हटले पाहिजे.
अमित शाह माफी मागा म्हणतात, हेच इडियटपणाचे लक्षण आहे. ज्यांना वंदे मातरम्चा इतिहास माहीत नाही, त्यांनी आधी इतिहास समजून घ्यावा. संसदेतून पळून गेले, ते इडियट नाहीत का? देशात रोज पेपर फुटत आहेत.
मंत्री इकडे-तिकडे फिरत आहेत. मग कुणाला इडियट म्हणायचे?, असा सवाल राऊत यांनी केला. 'इडियट' हा असंसदीय शब्द नसल्याचे स्पष्ट करत राऊत यांनी आमीर खानच्या 'थ्री इडियट्स' चित्रपटाचा दाखला दिला. या देशात 'थ्री इडियट्स' नावाचा चित्रपट आला.
त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. स्वतः पंतप्रधानांनीही हा चित्रपट पाहण्यास सांगितले होते. त्यामुळे भारतीय राजकारणातील 'थ्री इडियट्स' कोण आहेत, हे सर्वांना माहीत आहे. एक महाराष्ट्रात आहे आणि दोन केंद्रात आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चेलाही राऊत यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. शरद पवार कुठेही जाणार नाहीत. ते आमच्यासोबतच राहतील. शरद पवार हे इंडिया ब्लॉक आणि आघाडीचे नेते आहेत. भाजपकडून त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण केला जात आहे. आपण जोमाने लढू आणि जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वंदे मातरम्च्या मुद्द्यावरूनही राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. सोनिया गांधी यांनी वंदे मातरम् मध्येच थांबविले, हा भाजपचा नॅरेटिव्ह आहे. देशात वंदे मातरम्ला मान्यता काँग्रेसने दिली. कोलकाता काँग्रेस अधिवेशनात पहिल्यांदा वंदे मातरम् म्हटले गेले. त्यावेळी मुस्लिम व्यक्ती काँग्रेसचे अध्यक्ष होते. भाजपने इतिहास वाचावा, असे राऊत म्हणाले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी संसदेत वंदे मातरम्चा झालेला उल्लेखही त्यांनी केला.