

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळानिमित्ताने प्रस्तावित असलेल्या बाह्य रिंगरोड भोवती संशयाचे ढग गडद होत असून, हा रोड लोकहितासाठी की, आजी-माजी सनदी अधिकारी, राजकीय नेते आणि त्यांच्या चेलेचपाट्यांच्या जमिनींना भाव येण्यासाठी आहे? असा प्रश्न लोकांना पडत आहे. या शिवाय एका महिला आमदाराच्या पतीच्या नावे, कुंभमेळामंत्र्यांच्या जवळच्या लोकांनी या ठिकाणी जमिनी खरेदी केल्या असल्याचा आरोप करत या संबंधीचे पुरावे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांना देणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
विधान परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर आलेले शिवसेना (ठाकरे) गटाचे खा. राऊत यांनी बुधवारी (दि. ३) रामतीर्थ येथे मागील आठ दिवसांपासून रिंगरोडविरोधात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेत 'शिवसेना शेतकऱ्यांसोबत असल्याचा विश्वास दिला'. याप्रसंगी त्यांच्यासोबत माजी आ. वसंत गिते, अनिल कदम, जयंत दिंडे, दत्ता गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना खा. राऊत म्हणाले की, रिंगरोडला विरोध करणारे शेतकरी पहिल्या दिवसापासून टीपी (नगररचना योजना) व डीपी (विकास योजना) अंतर्गत रस्त्यासाठी काही प्रमाणात भूसंपादन झालेले असताना रिंगरोडचा घाट कोणाच्या हितसंबंधासाठी घातला जात असल्याचे ओरडून सांगत आहेत.
मात्र, त्यांच्याकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. काही निवृत्त व सेवेत असलेल्या आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या पत्नी, पीडब्ल्यूडीमधील अधिकाऱ्यांच्या नातलगांच्या नावे रिंगरोडच्या शेजारी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यांच्या जमिनीला भाव मिळावा यासाठी सोयीने अलाइनमेंट बदलण्यात आल्याचा आरोपही खा. राऊत यांनी केला. यासाठी त्यांनी नुकतेच एका कंपनीच्या संचालकाने गौळाणे गावात १३८ गुंठे जमीन खरेदी केली.
१४ मे २०२६ रोजी प्रसिद्धी झालेल्या भूसंपादन यादीत यांचे नाव नव्हते मात्र, अचानक अलाइनमेंट बदलून २१ गुंठे जमीन भूसंपादनात गेल्याचे २४ मे च्या यादीत प्रकाशित करण्यात आले. हे कोणासाठी? कशासाठी करण्यात आले असा प्रश्न खा. राऊत यांनी उपस्थित केला. या संदर्भातील सर्व पुरावे शेतकऱ्याने आपल्याला दिले असून, हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोदावरी नदीची अवस्था अत्यंत वाईट असून, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी गोदावरीचे पाणी पिऊन दाखवावे, असे आव्हान खा. संजय राऊत यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणणार
रिंगरोडला २७ गावांतील शेतकरी विरोध करीत आहेत. या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांशी भेट घडून आणणार असल्याची ग्वाही यावेळी खा. राऊत यांनी आंदोलकांना दिली. यावेळी त्यांनी गोदावरीच्या अस्वच्छतेवरही सडकून टीका केली.
राज्य सरकार व प्रशासनाने आमच्या सर्व मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार केला नाही तर ११ जून रोजी संपूर्ण कुटुंब, ट्रॅक्टर व बिन्हाड घेऊन शेतकरी मोठ्या संख्येने रामतीर्थावर जमतील. त्यानंतर सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल.
रिंगरोडला २७ गावांतील शेतकरी विरोध