

कोरगाव : पुढारी वृत्तसेवा
कोरगाव पंचायत क्षेत्रातील भालखाजण-माईन माणसा परिसरात नळाला येणाऱ्या खाऱ्या पाण्याचा प्रश्न ग्रामसभेत चांगलाच तापला. नागरिकांना खारे पाणीपुरवठा होत असल्याने पंचायत आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
ग्रामस्थ राहुल भगत यांनी खाऱ्या पाण्याचा मुद्दा ग्रामसभेत उपस्थित केला. मानवाधिकार विभागानेही या विषयाची दखल घेतल्याचे सांगत त्यांनी पंचायत प्रशासनाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले. बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा होत असल्यास त्याचीही तपासणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय, माळरानात बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीबाबत जलस्रोत खात्याने दिलेल्या अहवालावर पंचायतीने कोणती कारवाई केली, असा सवालही त्यांनी केला.
ग्रामसभेत रस्त्यांवरील खड्डे, कचरा, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पर्यावरणाच्या ऱ्हासाशी संबंधित विविध विषयांवरही सविस्तर चर्चा झाली.
ग्रामसभा सरपंच कल्पिता कलशकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसरपंच दिवाकर जाधव, पंचायत सदस्य अब्दुल करीम नाईक, देविदास नागवेकर, उमेश च्यारी, पंच सदस्य लौकिक शेट्ये, समीर भाटलेकर, नीता नर्से, अनुराधा कोरगावकर तसेच पंचायत सचिव अविनाश पाळणी उपस्थित होते. निरीक्षक म्हणून गटविकास कार्यालयाचे जितेंद्र तिळवे उपस्थित होते.
वर्षा देसाई यांनीही खाऱ्या पाण्याच्या प्रश्नाची पंचायतीने गंभीर दखल घेऊन संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी आणि नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. सरपंच कल्पिता कलशकर यांनी पंचायत प्रशासनाने यापूर्वीच पाणी विभागाला याबाबत कळविले असून संबंधित अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी व तपासणी केली असल्याची माहिती दिली. खाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पंचायत प्रयत्नशील असून लवकरच यावर योग्य तोडगा काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.