नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या २०२४-२५ जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव पाठविला आहे. या यादीत नाशिकच्या साल्हेर किल्ल्याचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. (Salher Fort Nashik)
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी भक्कम गड किल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले. गेली अनेक शतके ताठ मानेने उभे असलेल्या या गडकिल्ल्यांवर ऐतिहासिक वारशाची मोहोर उमटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील साल्हेर (जि. नाशिक), शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या ११ तसेच जिंजी किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादी (World Heritage List) मध्ये नामांकनासाठी पाठविण्यात आला आहे.
मुख्यमंत्री शिंदे याबाबत अधिक बाेलताना नामांकनासाठी पाठविलेल्या प्रस्तावामध्ये महाराष्ट्रातील शिव वारशांचा समावेश असून या किल्ल्यांना आता जागतिक ओळख मिळू शकणार आहे. युनेस्कोच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्राला नामांकन ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
साल्हेर-मुल्हेर या जोडीतला हा साल्हेरचा किल्ला असून सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्याच्या पश्चिमेला हा किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश किल्ले याच भागत आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये ५७ गिरिदर्ग आहेत. या गिरिदुर्गामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच असा साल्हेरचा किल्ला येतो.