

बोरागव : पुढारी वृत्तसेवा
सुरगाणा, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवण या आदिवासी भागांत पावसाळ्यात रानभाज्यांचा सुगंध दरवळण्यास सुरुवात झाली आहे. शेती किंवा निगा न करता निसर्गतःच उगवलेल्या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सत्त्व असल्याने आयुर्वेदात या भाज्यांना वरचे स्थान आहे. जंगलात शेतांच्या बांधावर, माळरानात त्या आढळतात. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात. आदिवासी भागात त्या आवर्जून खाल्ल्या जातात.
आदिवासी भागात शेवळा, वाघाटा, दिघडी आदींचा आजही पारंपरिक अन्न म्हणून वापर होतो. ऋतूनुसार त्यांना या भाज्या सहज उपलब्ध होत असून, जुन्या पिढीतील व्यक्तींना भाज्यांचे औषधी गुणधर्म माहीत आहे. या वनस्पती त्यांच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक बनल्या आहेत.
बाजारपेठेतून येणारा भाजीपाला विकत घेण्यापेक्षा जंगलात येणाऱ्या रानभाज्या शोधण्यासाठी आदिवासी लोक आता भर देत आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या बाजारात रानभाज्या विक्रीसाठी येण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक शहरात सरकारवाडा परिसरात सकाळी आदिवासी महिला या भाज्या विक्रीस आणत असून, त्याची विक्री चांगली होत आहे.
शेवळा, चाई, कवळी, मोखा, इगळी, रूखाळू, तेरा, दिघडी, वाघाटा आदी.
"रानभाज्या या जंगलात बिगर खतांच्या उगवत असल्याने या भाज्या खाल्ल्यास शरीरास उपयोगी पडणारे क्षारांचे प्रमाण म्हणजे प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, टाईप टू न्यू ट्रेन जास्त असल्यामुळे ते शरीरास उपयोगी पडतात. त्यामुळे आम्ही नागरिकांना पावसाळ्यात रानभाज्या खाण्याचे आवाहन करत असतो."
दिलीप रणवीर, तालुका वैद्यकीय अधिकारी, सुरगाणा