नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - सगळीकडे नवरात्र आणि दसऱ्याचा उत्साह असताना पावसाने गोंधळ घातला आहे. नागरिकांमध्ये दसऱ्याच्या खरेदीची लगबग सुरु आहे. या सगळ्यावर आता पावसाचे सावट असणार आहे. शहरासह ग्रामीण भागातही जोरदार पाऊस बरसत आहे. रात्रीपासून पावसाने हजेरी लावली असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे. नाशिक जिल्हयात सर्वत्र मुसळधार पाऊस आणि वादळामुळे शहराची अवस्था जलमय झाली आहे. बळीराजावर पुन्हा एकदा परतीच्या पावसाने संकट येऊन ठेपले आहे.
उद्या शनिवारी (दि.12) शहरासह विविध ठिकाणी दसरा सणानिमित्त राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. मात्र त्यावर परतीच्या पावसाचे सावट असणार आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या राजकीय नवरात्रीची धूम पहायला मिळाली. मात्र हवामान विभागाने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असल्याने पुढील दोन ते चार दिवसामध्ये जोरधार बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्याच्या काही भागांना यलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. पावसामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.