

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहे. कुंभमेळ्याच्या कामांतील भ्रष्टाचाराबाबत राज्यातील काँग्रेस नेत्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याकडे तक्रारी मांडल्या. यावर या मुद्द्यावर केंद्रात आवाज उठवणार असल्याचे गांधी यांनी यावेळी प्रदेश नेत्यांना सांगितले.
राहुल गांधी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बैठकीत राज्यातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर राहुल गांधींनी चर्चा केली. प्रामुख्याने शक्तिपीठ महामार्ग, कुंभमेळ्याच्या कामांसह शेतकरी प्रश्नांवर माहिती त्यांनी यावेळी नेत्यांकडून घेतली. नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्याच्या कामांबाबत मोठ्या तक्रारी असल्याचे यावेळी नेत्यांनी राहुल गांधी यांच्या निर्देशनास आणून दिले.
या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रदेश नेत्यांशी चर्चा सांगण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती घेऊन अहवाल द्यावा, अशा सूचना राहुल गांधी यांनी दिल्याचे बोलले जात आहे. याशिवाय एसआयआरबाबतही राहुल गांधी यांनी नेत्यांशी वन टू वन संवाद साधत विचारणा केली.
बूथ लेव्हलवरील कामांची माहिती त्यांनी घेतली. पक्ष संघटनेत काम करताना काय अडचणी आहेत का ? अशी विचारणा त्यांनी करत एकजुटीने काम करण्याचे निर्देश यावेळी दिले. तसेच पक्ष संघटनेत काय काय केले पाहिजे, याबाबतही राहुल गांधी यांनी नेत्यांकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या.
बैठकीस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळातील पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, रजनी पाटील, प्रणिती शिंदे, खा. डॉ. शोभा बच्छाव, माणिकराव ठाकरे, मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, डॉ. विश्वजित कदम, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, रेहाना चिश्ती, वामशी रेड्डी आदी उपस्थित होते.