नाशिक : शहरातील जमिनींवर डोळा ठेवून बेकायदेशीर कब्जे मिळवणे, सावकारीच्या माध्यमातून लाखो -कोट्यवधींची वसुली करणे आणि विरोध करणाऱ्यांना धमकावणे, अशा गंभीर आरोपांनी सद्दाम बाबू शेख, त्याची आई लता भिका बर्डे आणि राजाराम केशव गटकळ हे तिघे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. एकाच कालावधीत आडगाव आणि पंचवटी पोलिस ठाण्यांत दाखल झालेल्या दोन गंभीर गुन्ह्यांमुळे या कथित कारवायांची व्याप्ती मोठी असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही प्रकरणांमध्ये जमीन, पैशांची वसुली, धमकी आणि दबावाचा समान धागा असल्याचे फिर्यादींनी आरोपांतून मांडले आहे.
के. के. वाघ अॅग्रिकल्चर कॉलेजसमोरील रासबिहारी रोड, धात्रक फाटा परिसरातील सर्व्हे क्रमांक २४०/१ मधील ८ हजार ६२५ चौरस मीटर जागेवर कब्जा मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. या जागेचे मालक श्रीकांत मधुकर कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयितांनी संगनमत करून जुनी कागदपत्रे तयार करून जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. जागेवर देवांच्या मूर्ती ठेवून ती रिकामी करण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यातील एक लाख रुपये घेतल्यानंतर उर्वरित रक्कम न दिल्यास कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणानंतर पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या दुसऱ्या गुन्ह्यानेही खळबळ उडाली आहे. मेडिकल व्यावसायिक विजय पुंडलिक शिरोडे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, २० लाख रुपयांवर तब्बल ४८ लाख रुपयांचे व्याज वसूल करूनही आणखी ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. शिरोडे यांना भगवती हॉटेल परिसरातून जबरदस्तीने कारमध्ये बसवून अमृतधाम येथील गोल्डस्टार कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथे सुमारे चार तास डांबून ठेवत मारहाण व गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
इतकेच नव्हे, तर शिरोडे व त्यांच्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी देत सव्र्व्हे क्रमांक २६१/२ मधील प्लॉटच्या डेव्हलपमेंट अॅग्रीमेंटवर दबावाने सह्या घेतल्याचा आरोप आहे. प्लॉटचा ताबा न दिल्यास खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ आर्थिक व्यवहाराचा प्रश्न नसून, मालमत्तेवर दबावाने हक्क निर्माण करण्याचा कथित प्रयत्न झाल्याचे आरोप गंभीर मानले जात आहेत.
गेल्या अनेक वर्षांतील कथित जमीन व्यवहार, सावकारी आणि दबावाच्या तक्रारींची आता पडताळणी पोलिसांकडून होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आणखी तक्रारी पुढे येणार का तसेच संशयितांना नेमके कोणाचे राजकीय अथवा अन्य प्रकारचे पाठबळ होते का, याचाही तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे. इतक्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणाचा तपास केवळ दोन गुन्ह्यांपुरता मर्यादित न राहाता, कथित आर्थिक आणि मालमत्ता व्यवहारांच्या मुळापर्यंत जाणार का, याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
आता जुन्या व्यवहारांचीही चौकशी होणार?
या दोन गुन्ह्यांमुळे गेल्या काही वर्षांतील संशयितांचे जमीन व्यवहार, आर्थिक देवाणघेवाण, सावकारीचे व्यवहार तसेच मालमत्तांवरील कथित ताब्यांची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेक वर्षांपासून अशाच पद्धतीने व्यवहार सुरू होते का, या काळात आणखी किती व्यक्तींवर दबाव आणण्यात आला, किती रकमेची वसुली झाली आणि कोणत्या मालमत्तांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाला, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
सावकारीच्या साम्राज्यामागे 'आश्रयदाता' कोण?
वर्षानुवर्षे कथित बेकायदा सावकारी आणि जमीन कब्जाचे व्यवहार करणाऱ्या सद्दाम शेख व लता बर्डे यांना नेमके कुणाचे पाठबळ होते, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कथित आर्थिक व्यवहार आणि जमीन कब्जे होत असतील, तर त्यामागे मदत करणारे अथवा संरक्षण देणारे कोण होते, याचा शोध पोलिस यंत्रणा घेणार आहे. त्यांच्या संपर्काचे जाळे, आर्थिक व्यवहार आणि जुन्या जमीन प्रकरणांची चौकशी झाल्यास पडद्यामागील चेहरे समोर येण्याची शक्यता आहे.